दिवाळीला पेठ रस्त्याचा दुखवटा

दिवाळीला पेठ रस्त्याचा दुखवटा

सांगली -  सांगली ते पेठ रस्ता पॅचवर्क करण्याच्याही लायकीचा राहिला नाही. हा रस्ता नवीन झाला पाहिजे. गेली अनेक वर्षे खड्डेमय बनलेल्या रस्त्यावर  १७ ऑक्‍टोबरला सायंकाळी दिवे लावून काळी दिवाळी करून दुखवटा व्‍यक्त  करण्याचा निर्णय सर्वपक्षीय कृती समितीने घेतला. रस्त्यांच्या प्रश्‍नांवर आता कृती समितीच्या माध्यमातून उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा तसेच जनआंदोलन करण्याचा निर्धारही यावेळी केला.

सांगली ते पेठ रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत आहेत. तक्रारी देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग सुस्तच आहे. तक्रारीनंतर काल रस्त्यावर पॅचवर्क केले. परंतु पॅचवर्क करण्यापेक्षा आता ठोस निर्णय घेतला जावा यासाठी कृती स्थापन  केली आहे. समितीच्यावतीने आज पंचमुखी मारुती रस्त्यावरील कष्टकऱ्यांची दौलत येथे बैठक घेण्यात आली. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, बापूसाहेब मगदूम, बापूसाहेब पाटील, पृथ्वीराज पवार, सतीश साखळकर, 
ॲड. अमित शिंदे, अतुल शहा, महेश खराडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

दिलीप पाटील म्हणाले,‘‘एखाद्या प्रश्‍नांवर सर्व तरुण कार्यकर्ते एकत्र येऊन आवाज उठवत आहेत ही चांगली गोष्ट आहे. समितीमध्ये येताना सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून आले पाहिजे. सांगली-पेठ रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांना त्रास होतो. त्यामुळे रस्त्यासाठी आंदोलन सुरू ठेवा. मी तुमच्या पाठीशी आहे.’’

पृथ्वीराज पवार म्हणाले,‘‘सांगली-पेठ इस्लामपूर रस्ता खराब होण्यामागे ज्यांचे पाप आहे, ते त्यांच्या ओटीत टाकले पाहिजे. मागील काळातील आणि सध्याचे  सत्ताधारी यांची ही जबाबदारी आहे. रस्त्यावर सध्या पॅचवर्क नको आहे. पॅचवर्कमुळे भ्रष्टाचार करण्याचे कुरण मिळते.’’

ट्रान्स्पोर्ट संघटनेचे महेश पाटील म्हणाले,‘‘रस्ते कामाची निविदा दिल्यानंतर त्याची दुरुस्तीची जबाबदारीही ठेकेदारांवर दिली जाते. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते. पेठ रस्ता नव्याने करण्याची गरज आहे. दुरुस्ती  करण्याच्या लायकीचा हा रस्ता राहिला नाही.’’

ॲड. अमित शिंदे म्हणाले,‘‘विधी सेवा प्राधिकरणाकडे रस्त्याबाबत तक्रार केली आहे. तेथून ती उच्च  न्यायालयात गेली आहे. रस्त्यासाठी जनआंदोलन आणि याचिका दाखल केली जाईल. सांगली-पेठ रस्ता प्रवासासाठी सुरक्षित असल्याबद्दल अद्यापही बांधकाम विभागाने प्रमाणपत्र दिले नाही. रस्ता सुरक्षा समिती काम करत नाही. काल केलेले पॅचवर्क ‘आयआरएस’ प्रमाणे झालेले नाही.’’

अमर पडळकर म्हणाले,‘‘समितीचे काम राजकारण विरहित करू. रस्त्याची जबाबदारी असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवर धरले पाहिजे.’’

महेश खराडे, रवींद्र चव्हाण, आशरफ वांकर, नितीन चव्हाण, सागर घोडके, डॉ. संजय पाटील, सतीश साखळकर, याकुब मणेर, आयुब पटेल, असिफ बावा यांनी मनोगत व्यक्त केले. १७ रोजी सांगली ते पेठपर्यंत रस्त्यावर दिवे लावून दु:खाची दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. रस्त्यावर बळी जाणाऱ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी १९ नोव्हेंबर हा दिवस शासनाने निश्‍चित केला आहे. १७ रोजी दु:खाची दिवाळी आणि श्रद्धांजलीचा कार्यक्रम होईल. विकास मगदूम, राजू सावकार, शाकीर तांबोळी, निखील कारंडे, अभिषेक सावंत आदी उपस्थित होते.

पॅचवर्कचा केला पंचनामा
बांधकाम विभागाने काल लक्ष्मी फाटा येथे केलेल्या पॅचवर्क कामाचा समितीने दुपारी पंचनामा  केला. हे पॅचवर्क ‘आयआरएस’ च्या नियमाप्रमाणे झाले नसल्याचे उघडकीस आणले. पॅचवर्क केलेल्या खड्ड्यांत पाणी असल्याचे तपासणीवेळी दिसले. बोगसगिरीबद्दल थेट जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांच्याकडे तक्रार केली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com