सहा लाखांवर जमिनीच्या आरोग्यपत्रिकांचे वितरण

सहा लाखांवर जमिनीच्या आरोग्यपत्रिकांचे वितरण

मागील दोन वर्षांची स्थिती - शेतकऱ्यांची रासायनिक खतावर होणाऱ्या खर्चात मोठी बचत

सांगली - राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत गेल्या दोन वर्षांत मृत आरोग्य अभियानांतर्गत ६  लाख १४ हजार २८३ शेतकऱ्यांना आरोग्यपत्रिकेचे वितरण करण्यात आले आहे. माती परीक्षणानंतर शेतकऱ्यांनी कोणती खते वापरावीत, कोणती वापरू नयेत, याबाबत अहवालात स्पष्ट नमूद केले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा रासायनिक खतावर होणाऱ्या खर्चात मोठी बचत झाली आहे. 

जिल्ह्यात सोळा माती चाचणी प्रयोगशाळा आहेत. त्यातील एक शासकीय आणि पंधरा खासगी प्रयोगशाळेच्या समावेश आहे. सन २०१५-१६ मध्ये मृद आरोग्य अभियानाअंतर्गत ९९ गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी तपासून २ लाख ४५ हजार ५३६ शेतकऱ्यांना तर सन २०१६-१७ मध्ये ६९ हजार ९०५ माती नमुन्याचे विश्‍लेषण करून ३ लाख ७८ हजार ७४७ खातेदारांना आरोग्यपत्रिकेचे वाटप करण्यात आले. जमिनीच्या आरोग्यपत्रिकेत नऊ घटकांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सामू, क्षारता हे दोन रासायनिक गुणधर्म तपासण्यात आले असून, सेंद्रिय कर्ब, स्फुरद व पालांश या प्रमुख अन्नद्रव्यांची तपासणीही करण्यात आली आहे. एकूण सूक्ष्म मूलद्रव्यापैकी तांबे, जस्त, लोह, मंगल ही चार तपासून मिळतात.

याबाबत मृद सर्वेक्षण चाचणी अधिकारी प्रकाश कुंभार यांनी सांगितले, की जमिनीची आरोग्यपत्रिका मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची मूल्यद्रव्यांची पातळी समजून घेणे गरजेचे आहे. त्यामध्ये आपल्या जमिनीची सामू पातळी व क्षारती किती आहे, हे पाहावे आणि त्यानुसार दिलेला विशेष सल्ला असेल तो उदा. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असेल (मध्यम अल्कली) अशावेळी जमिनीत सेंद्रिय खते, धैंचा, उडीद, मूग, ताग हिरवळीच्या खताचा वापर करावा. 

सेंद्रिय कर्ब, स्फुरद व पालाश तिन्ही घटकांच्या बाबतीतही वरीलप्रमाणे शिफारशींचा अवलंब करणे गरजेचे आहे. सांगली जिल्ह्याची सर्वसाधारण सुपीकता निर्देशांक सेंद्रिय कर्ब (नत्र) व स्फुरद पातळी कमी ते मध्यम आहे, मात्र पालांशची पातळी सर्व तालुक्‍यात भरपूर आहे. नत्र, स्फुरदची कमतरता भरून काढण्यासाठी सेंद्रिय तसेच शेणखतांचा सल्ल्यानुसार वापर करावा. पालांश भरपूर असताना शेतकरी त्याचाच अधिक वापर करतात. परिणामी पिकांचा उत्पादन खर्च वाढतो.

शेतकऱ्यांनी आरोग्यपत्रिकेतील तपासणीआधारे किंवा शिफारशीनुसारच खतांचा वापर करावा. यामुळे रासायनिक खतांच्या खर्चात मोठी बचत होईल. जमिनीला संतुलित खताची मात्रा मिळून जमिनीचे आरोग्य शाबूत राहून उत्पादन क्षमता टिकून राहते.
-प्रकाश कुंभार, जिल्हा मृद चाचणी अधिकारी, सांगली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com