कर्नाटकला पाणी, जिल्ह्यात टंचाई

कर्नाटकला पाणी, जिल्ह्यात टंचाई

१२९ टॅंकर सुरू; दोन लाख लोक बाधित, १०६ विहिरींचे अधिग्रहण

सातारा - कर्नाटकात ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यास मज्जाव केला जात असतानाही, महाराष्ट्राची जीवनदायिनी असलेल्या कोयना धरणातून कर्नाटक राज्याला पाणी दिले जात आहे. अवकाळी पावसाने अद्यापही दमदार साथ दिली नसल्याने टॅंकरची संख्या आता १२९ वर पोचली आहे. पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. १६८ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. 

जिल्ह्यात पाणीटंचाईने गेल्या वर्षीपेक्षा भीषण रूप धारण केले आहे. एकट्या माण तालुक्‍यात ५९ गावांना ५४ टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

मेअखेरपर्यंत त्यात आणखी भर पडण्याची शक्‍यता आहे. टंचाई आढावा बैठकीत टॅंकर मंजूर केले जात नसल्याचे आरोप लोकप्रतिनिधींनी केले होते. त्यामुळे प्रशासनानेही टॅंकर संख्या वाढविण्यात हात मोकळे सोडले आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वळिवाच्या पावसाने दुष्काळी तालुक्‍यांमध्ये हजेरी लावली, तरी ते प्रमाण अत्यंत कमी असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी झालेले नाही. 

माणसह खटाव, उत्तर कोरेगाव तालुक्‍यांमध्येही पाणीटंचाई गंभीर झाली आहे. महाबळेश्‍वर, जावळी या पूर्वेकडील 

डोंगराळ भागातही पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. पाण्याचे झरे आटल्याने तेथील लोकांना टॅंकरशिवाय पर्याय उरला नाही. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ठोस उपाय होत नसल्याने दर वर्षीप्रमाणे यावर्षीही भीषण टंचाई भासत आहे. सद्यःस्थितीत १०६ विहिरींचे अधिग्रहण केले असून, त्याद्वारे टॅंकर भरले जात आहेत.

जिल्ह्यात भीषण टंचाई असतानाही कर्नाटक सरकारच्या विनंतीवरून महाराष्ट्राने कोयनेतून पाणी देण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार कोयनेतून ३८४८ क्‍युसेक प्रती सेकंद या वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. कोल्हापूरमधील राजाराम बंधारा येथून पाणी मोजून कर्नाटकला चार टीएमसी पाणी दिले जाणार आहे. सध्या धरणातून १७३० क्‍युसेक, तर पायथ्याजवळच्या विद्युत गृहातून २१११ क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

एकूण ३८४८ क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे. कोयना धरण सातारा जिल्ह्यात असून, टेंभू प्रकल्पाद्वारे ते पाणी खटावला नेण्याची तरतूद आहे; परंतु ही कामे अपूर्ण असल्याने राज्यातील अग्रगण्य धरण जिल्ह्यात असतानाही त्याचा फायदा दुष्काळ खटाव तालुक्‍याला होत नाही. याचा संताप दुष्काळग्रस्तांना आहेच. त्यातच कर्नाटकातील मंत्री ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्यास मज्जाव करत आहे आणि कोयनेतून कर्नाटकला पाणी सोडले जात आहे. त्याचा संतापही व्यक्‍त होत आहे. 

खेपांचे टक्‍केवारी वाढली

एप्रिलअखेरीस पालकमंत्री विजय शिवतारे यांनी टंचाई आढावा बैठक घेतली होती. त्यामध्ये खेपांचे संख्या कमी असल्याचे लोकप्रतिनिधींनी मांडले होते, तरीही त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याने ‘सकाळ’ने त्याचा पाठपुरावा केला होता. सद्यःस्थितीत ६८ वरून ८८ टक्‍क्‍यांवर खेपांची टक्‍केवारी पोचली आहे. माण तालुक्‍यात ५० टक्‍केच खेपा होत असताना आता ८७.५० टक्‍के खेपांची टक्‍केवारी आहे. खटावला ती ९६ टक्‍के आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com