कालबाह्य कृष्णा नदी पूल वाहतुकीसाठी धोकादायक

कालबाह्य कृष्णा नदी पूल वाहतुकीसाठी धोकादायक

भुईंज - ‘‘ पुणे- बंगळूर महामार्गावर सहापदरीकरणात तयार करण्यात आलेल्या कृष्णा नदीवरील पुलावर दोन्ही बाजूंनी विरुद्ध दिशेने होत असलेली वाहतूक अत्यंत धोकादायक ठरत आहे. त्यामुळे अनेक वेळा अपघात होत आहेत. याबाबत महामार्ग प्राधिकरणाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांतून होत आहे.

महामार्गावर भुईंज, पाचवड ही जवळजवळ असणारी मोठ्या लोकसंख्येची गावे आहेत. या मोठ्या गावांच्या बाजारपेठेतून महामार्ग जातो. त्यामुळे दोन्ही गावांतील नागरिक व दोन्ही गावांच्या शेजारी असणाऱ्या वाड्यावस्त्यांतील नागरिकांची कायम वर्दळ असते. भुईंज परिसरातील अनेक गावांतून लोक भुईंजमार्गे सातारा व वाई येथे दुचाकी, चारचाकी वाहनांतून जात असतात. भुईंज किंवा पाचवडमधून जाताना काहीवेळेस त्यांना एक- दोन किलोमीटर फिरून जावे लागते. ते आंतर वाचविण्यासाठी वाहनधारक विरुद्ध दिशेने जाऊन समोरून येणाऱ्या वाहनांची पर्वा न करता धोकादायकरीत्या प्रवास करीत असतात. अशा वेळी अनेकदा अपघात घडले असून, याठिकाणी विरुद्ध दिशेने होणाऱ्या वाहतुकीवर निर्बंध आणावेत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

देशातील जे १०० जुने पूल धोकादायक अवस्थेत आहेत. त्यात महाराष्ट्रातील  तब्बल १५ पुलांचा समावेश आहे. त्यात पुणे, कोल्हापूर विभागातील पुलांचा समावेश आहे. वेळीच देखभाल दुरुस्ती न झाल्यास सावित्री नदीवरील दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याचा धोका आहे. केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी देशातील १०० पूल अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याची कबुली सहा महिन्यांपूर्वी लोकसभेत दिली होती. हे फक्त राष्ट्रीय महामार्गावरील पूल आहेत. त्यात ब्रिटिशकालीन पुलांचा समावेश आहे. त्यामुळे गडकरी यांच्याही पूर्वी ब्रिटिशांनी या कालबाह्य झालेल्या पुलाबाबत संबंधित ग्रामपंचायतींना पत्र दिली आहेत. मात्र, अशा मोठ्या पुलांबाबत काहीच काळजी न घेता चौपदरीकरणानंतर आता सहापदरीकरणातही कालबाह्य पुलांना समाविष्ट करून घेतले आहे. या जुन्या पुलांच्या भिंतींवरून अनेक ठिकाणी मोठी झाडी वाढली आहे. या सर्व बाबींमुळे कृष्णेवरील पूल मृत्यूचा सापळा बनत असल्याने दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठ्या संकटाला सामोरे जावे लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

कृष्णा नदीवरील पुलावरून किसन वीर साखर कारखान्याची ऊस वाहतूक, असले, पाचवड, अमृतवाडी, कुडाळ आदी गावांतील नागरिकांची वर्दळ असते. अशातच विरुद्ध दिशेने प्रवास करणाऱ्या वाहनांची रेलचेल होत असल्याने अपघाताची शक्‍यता नाकारता येत नाही.
- बाळासाहेब कांबळे, सरपंच भुईंज.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com