रुग्ण हजर, वैद्यकीय अधिकारी गैरहजर

रुग्ण हजर, वैद्यकीय अधिकारी गैरहजर

सातारा - जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाचे बाह्यरुग्ण विभागाच्या नियंत्रणाकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे सकाळी व सायंकाळच्या बाह्यरुग्ण विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांची अल्पकाळ उपस्थिती दिसते. त्यातूनच जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या रुग्णांची त्यामुळे परवड होत आहे. अनेकदा ही बाब निदर्शनास येऊनही कारवाई होत नसल्यामुळे या अधिकाऱ्यांचे करायचे काय? असा प्रश्‍न सातारकरांना पडला आहे.

खासगी आरोग्य सुविधेचे दर वाढले असल्यामुळे नागरिकांचा जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागाकडे ओघ वाढतो आहे. जिल्ह्याच्या विविध भागातून दररोज सुमारे हजारो लोक चांगल्या उपचाराच्या अपेक्षेने या ठिकाणी येतात. बाह्यरुग्ण विभागाची आवश्‍यकता विचारात घेऊन शासनाने सकाळबरोबर सायंकाळी बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाची तत्कालीन शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी काटेकोर अंमलबजावणी केली होती. मात्र, डॉ. श्रीकांत भोई यांनी पदभार स्वीकारल्यापासून या विभागावरील नियंत्रण सुटले आहे आणि आता तर त्यात जास्त भर पडली आहे.

सातारचे जिल्हा रुग्णालय राज्यात नावाजलेले आहे. चांगल्या सुविधांमुळे बाह्यरुग्ण विभागात नागरिकांच्या रांगा लागतात. मात्र, केसपेपर काढण्यापासून त्यांची परवड सुरू होते. केसपेपर काढण्यासाठी अनेकदा पुरेसे कर्मचारी दिले जात नाहीत. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळावर तेथील कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यातून अनेकदा रुग्णांच्या नाराजीलाही त्यांना सामोरे जावे लागते. कर्मचाऱ्यांच्या अभावी जुने केसपेपर व्यवस्थित ठेवण्यातही अडचणी निर्माण झाल्याची परिस्थिती डॉ. भोई यांच्या कालावधीत पहिल्यांदा अनुभवायला मिळाली.

केसपेपर मिळाल्यावर नागरिकांची खरी फसवणूक सुरू होते. तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी असल्यामुळे रुग्ण या ठिकाणी येत असतात. मात्र, बऱ्याचदा बाह्यरुग्ण विभागामध्ये नऊ वाजता डॉक्‍टर येतच नाहीत. 

निवांतपणे साडेदहा अकरानंतर येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सायंकाळच्या बाह्यरुग्ण विभागाच्या वेळेत तर, बहुतांश वैद्यकीय अधिकारी वेळेत उपस्थित नसतात. हजेरी लावण्यापुरतेच त्यांचे पाय रुग्णालयाला लागतात. शिकाऊ डॉक्‍टरांकडून रुग्णांना उपचार करून घ्यावा लागतो. अनेकदा तेही जागेवर नसतात. त्यामुळे नागरिकांना जिल्हा शल्यचिकित्सक किंवा निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या केबिनच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. त्यानंतर कोणत्या विभागात कोण डॉक्‍टर आहे, याची शोधाशोध सुरू होते. फोन करून त्यांना बोलावले जाते. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी काही वेळाने दाखल होतात. तोपर्यंत बाह्यरुग्ण विभागाची वेळ संपत आलेली असते. हा त्रास टाळण्यासाठी सकाळी येत जावा चांगले असते, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रुग्णाला दिला जातो. त्यामुळे सायंकाळचा बाह्यरुग्ण विभागाला नावालाच उरतो आहे. परिणामी सर्वसामान्य रुग्णाची परवड सुरू राहिली आहे. 

जिल्हा रुग्णालयाला शिस्त लावायची कोणी, हे जिल्हाधिकाऱ्यांनीच एकदा संबंधितांना समजावणे आवश्‍यक बनले आहे. अन्यथा जिल्ह्याच्या महत्त्वाच्या रुग्णालयातील आरोग्य सुविधेचीही वाताहात अशी सुरू राहील.

जबाबदारीचे आकलन महत्त्वाचे 
जिल्हा रुग्णालयात एवढी दयनीय अवस्था कधीही पाहायला मिळत नव्हती. मात्र, जिल्हा शल्यचिकित्सक व निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याचे काहीच वाटत नाही. जिल्हा रुग्णालयाची जबाबदारी निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सकांकडून सांगितले जाते. ते खरेही आहे. मात्र, शेवटी जबाबदारी त्यांचीही असतेच. निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यात जिल्हा शल्यचिकित्सकांची अडचण जाणवते. अनेकांच्या तक्रारी केल्या तरी त्यांच्याकडून कारवाई केली जात नाही. त्यामुळे ऐकणार कोण, असा प्रश्‍न त्यांच्याकडून उपस्थित केला जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com