उशिरा का होईना ऊस उत्पादकांना दिलासा

उशिरा का होईना ऊस उत्पादकांना दिलासा

केंद्र सरकारच्या कृषिमूल्य आयोगाने आगामी २०१७-१८ हंगामासाठी उसाला टनामागे किमान आधारभूत किंमतीत (एफआरपी) अडीचशे रुपयांनी वाढ केलेली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ‘एफआरपी’त वाढ न केल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. ही नाराजी दूर करताना केंद्र सरकारने ‘एफआरपी’मध्ये अडीचशे रुपये वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. त्यामुळे आगामी ऊस गळीत हंगामात साडेनऊ टक्के उताऱ्यास तोडणी व वाहतुकीसह २५५० रुपये ‘एफआरपी’ मिळणार आहे. 
 

शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे वाढत असलेले प्रमाण, बाजारपेठेत शेतमालाचे घसरलेले दर, तुरीचे वाढलेले उत्पादन आणि तूर खरेदीमधील अनेक दोष आदी प्रकरणांमुळे केंद्र आणि राज्य सरकार कृषी क्षेत्रात अपयशी ठरल्याची भावना शेतकऱ्यांच्यात निर्माण झाली आहे. अशा पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आर्थिक घडामोडींविषयक आढावा बैठकीत उसाच्या ‘एफआरपी’मध्ये अडीचशे रुपये वाढ करण्याचा निर्णय घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. 

वाढती महागाई व शेतमालाला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला आहे. २०१५-१६ आणि १६-१७ मध्ये ‘एफआरपी’मध्ये वाढ न केल्यामुळे साडेनऊ टक्के उताऱ्यास २३०० रुपये प्रमाणे ‘एफआरपी’ दिली जात होती व त्या पुढील उताऱ्यास प्रत्येक पॉइंट २३२ ते २४२ रक्कम निश्‍चित करण्यात आलेली होती. त्यामुळे जिल्ह्यामधील कारखान्यांकडून तोडणी व वाहतूक वजा जाता प्रति टनाला २४०० ते २५०० रुपये पर्यंत दर मिळाले होते. साखरेचे दर वाढल्यामुळे काही कारखान्यांनी तर २८०० रुपयांपर्यंत दर दिलेले होते. मात्र, काही कारखान्यांनी नुसतीच ‘एफआरपी’ दिल्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला होता. आता अडीचशे रुपये ‘एफआरपी’मध्ये वाढ केल्यामुळे साडेनऊ उताऱ्यास २५५० रुपये दर मिळणार आहे. आजवर प्रत्येकवर्षी ‘एफआरपी’ मध्ये १०० रुपये होणारी वाढ व आता एकदम सव्वादोनपट म्हणजे अडीचशे रुपयांनी केलेली वाढ शेतकऱ्यांना निश्‍चित दिलासा देणारी आहे. ‘एफआरपी’मध्ये जरी वाढ केलेली असली तरी साडेनऊ टक्‍क्‍यांच्यावर वाढणाऱ्या प्रति पॉइंट उताऱ्यास नेमकी किती रक्कम दिली जाणार? याबाबत निर्णय झालेला नसल्यामुळे पहिला हप्ता नेमका किती मिळणार?

याबाबत चित्र स्पष्ट होणार नाही. सध्या साखरेचे दर चांगले असल्याने कारखानदारांना ‘एफआरपी’ देण्यात काही अडचण येणार नाही. मात्र, दुर्दैवाने जर साखरेचे दर घसल्यास ‘एफआरपी’ एकरकमी मिळणार का ? की मागील दोन वर्षांपूर्वीप्रमाणे ८० - २० सूत्राचा स्वीकार केला जाणार, हे पाहावे लागणार आहे. गत हंगामात जिल्ह्यातील कारखान्यांचा सरासरी साखर उतारा हा ११ ते १२ टक्के आलेला होता. या उताऱ्यावर अगामी हंगामात दर दिला जात असल्यामुळे साखर उताऱ्याच्या ९.५० टक्‍क्‍यांपुढील प्रत्येक पॉइंटला नेमकी किती रक्कम सरकार जाहीर करणार, यावर उसाचा पहिला हप्ता निश्‍चित होणार आहे. आता त्याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com