जग तुमच्या हाती, क्षमता सिद्ध करा - डॉ. अनिल पाटील

सातारा - ‘यिन समर यूथ समिट’चे गुरुवारी दीपप्रज्वलनाने उद्‌घाटन करताना डॉ. अनिल पाटील. शेजारी डॉ. सुहास माने, प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, कौस्तुभ फडतरे, श्रीकांत कात्रे, राजेश निंबाळकर, अनिकेत मोरे.
सातारा - ‘यिन समर यूथ समिट’चे गुरुवारी दीपप्रज्वलनाने उद्‌घाटन करताना डॉ. अनिल पाटील. शेजारी डॉ. सुहास माने, प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, कौस्तुभ फडतरे, श्रीकांत कात्रे, राजेश निंबाळकर, अनिकेत मोरे.

सातारा - जागतिकीकरणाच्या युगात बुद्धीला किंमत आली आहे. तुम्ही ‘डिजिटल चाईल्ड’ आहात. गुणवत्ता दाखवा आणि मागेल ते मिळवा, ही परिस्थिती सध्या आहे. पुढील काही वर्षांत जगाला काम करण्यास हात देणारा भारत देश असेल. त्यामुळे जग तुमच्या हातात आहे. तुम्हाला पाहिजे, त्या जागेवर जाऊन तुम्ही राज्य करू शकता. त्यासाठी तुमच्यातील क्षमता सिद्ध करावी लागेल, असे प्रेरणादायी वक्‍तव्य रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील यांनी केले. 

‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ आणि स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी प्रस्तुत ‘यिन समर यूथ समिट-२०१७’ पॉवर्ड बाय नीलय ग्रुप या उपक्रमाला आज येथील यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाच्या कर्मवीर सभागृहात सुरवात झाली. तरुणाईचे व्यक्‍तिमत्त्व खुलविणाऱ्या या तीन दिवसीय उपक्रमाचे उद्‌घाटन डॉ. अनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. जीवनातील यशाचा मार्ग शोधण्यासह उद्योजकता, अभिनय क्षेत्रातील करिअरच्या वाटांवर तज्ज्ञांनी आज दिवसभरात मार्गदर्शन केले. 

उद्‌घाटन कार्यक्रमास शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, यशवंतराव चव्हाण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. कानडे, उद्योजक कौस्तुभ फडतरे, ‘सकाळ’चे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे, शाखा व्यवस्थापक राजेश निंबाळकर, ‘यिन’ मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री अनिकेत मोरे, ‘यिन’मंडळाचे राज्याध्यक्ष अजिंक्‍य शेवाळे आदींची उपस्थिती होती. सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, ‘सीड’ इन्फोटेक, सीडीएसएल, सह्याद्री फार्म यांचेही उपक्रमासाठी सहकार्य लाभले. 

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘जागतिकीकरणामुळे जगभरातील कंपन्या भारतात येत आहेत. भारतातील कंपन्यांनीही जगातील अनेक कंपन्यांची मालकी घेतली आहे. या युगात बुद्धीला महत्त्व आले असून, त्याचीच किंमत होत आहे. जाती, धर्म, प्रकल्पग्रस्त, पूरग्रस्त हे आता विचाराधीन नाही. गुणवत्ता दाखवा आणि मागाल तो पगार मिळवा, अशी स्थिती आहे.

बुद्धिमत्ता असेल तर नोकरी करा, अशी मागणी करणारी यंत्रणा जन्माला आली आहे. पुढील काही वर्षांत जगाला काम करण्यास हात देणारा भारत हा देश असेल. भारतात सर्वाधिक तरुण आहेत. अमेरिकास्थित सर्व भारतीयांनी अमेरिका सोडायची ठरविल्यास अमेरिका एक दिवस जगू शकणार नाही. ‘नासा’ही बंद राहील. २०२२ मध्ये चीन, भारत, अमेरिका ही राष्ट्रे, तर त्यापुढे चीन आणि भारत हीच राष्ट्रे महासत्ता असतील.’’

निसर्गाने दिले आहे, त्याचा वापर करता आला पाहिजे. नारायण मूर्तींच्या मते ७५ टक्‍के अभियंते बिनकामाचे आहेत. शिक्षक जे शिकवतात तेच मुले शिकतात. त्याच्या पलीकडे जाऊन ज्ञान घेत नाहीत. जागतिकीकरणात आर्टिफिशल, रोबोटिक्‍स वाढत आहेत.

ते बदल स्वीकारून नोकरीसाठी लायक बनले पाहिजे. जगात दर १२ मिनिटाला ज्ञान दुप्पट होत आहे. त्यामुळे येणारे बदल स्वीकारून चालले पाहिजे. पुढील पाच वर्षांत शिक्षण पद्धती बदलणार आहे. त्यादृष्टीने तुम्हीही बदलावे, असे मार्गदर्शनही डॉ. पाटील यांनी केले. 

डॉ. माने म्हणाले, ‘‘ ‘सकाळ’ने सामाजिक जाणीव निर्माण करणारे व्यासपीठ उभे केले आहे. युवकांत जगण्याची, आयुष्याला कलाटणी देणारी क्षमता असते. युवकांनी मानसिक, शारीरिक शक्‍तीवर काळाला आव्हान द्यावे.’’
प्राचार्य कानडे म्हणाले, ‘‘आधुनिक महाराष्ट्र घडविण्याची उमेद युवकांत आहे. ‘यिन’च्या माध्यमातून युवकांची सामाजिक जडण-घडण होत आहे. उद्याच्या महाराष्ट्रात आम्ही कोठे असणार आहोत, यासाठी यूथ समिट मधून मार्गदर्शन मिळेल.’’ श्री. कात्रे यांनी प्रास्ताविक केले. निरंजन फरांदे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. निंबाळकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com