पात्रता परीक्षा झाली... भरती केव्हा?

पात्रता परीक्षा झाली... भरती केव्हा?

परीक्षार्थी भरतीच्या प्रतीक्षेत; विद्यार्थ्यांचे नुकसान

सातारा - स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीसाठी शासनाकडून पात्रता परीक्षा घेतली जात आहे. रिक्‍त जागांचा डोंगर उभा असून, त्यातून विद्यार्थ्यांचे नुकसानही होत आहे. तरीही प्रत्यक्षात शिक्षक भरती प्रक्रिया राबविली जात नाही. त्यामुळे टीईटी परीक्षा पास असलेले, परीक्षा दिलेल्या उमेदवारांना भरती प्रक्रिया केव्हा राबविली जाणार, याची आस लागली आहे. 

राज्य शासनाने दोन मे २०१२ पासून शिक्षक भरतीवर बंदी घातली आहे. पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवीसाठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यमे, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांत शिक्षण सेवक, उपशिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून राज्यभर टीईटी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी राज्यभरातून लाखो उमेदवार बसत आहेत. दरवर्षी केवळ तीन ते चार टक्के निकाल लागतो. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र मिळते. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळेत शिक्षक होण्यासाठी केंद्रीय भरतीपूर्व निवड परीक्षा (सीईटी) द्यावी लागते. शासनाने अनेकदा टीईटी परीक्षा घेतली आहे. मात्र, अद्याप सीईटी परीक्षा न झाल्याने भावी शिक्षकांमध्ये नाराजी आहे. शिक्षक पात्रता परीक्षा पात्र उमेदवार प्रमाणपत्र घेऊन पुढील परीक्षेची आशेने वाट पाहात आहेत. 

शालेय शिक्षण विभागाने २३ जूनला परिपत्रक काढले. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशत: अनुदानित व अनुदानास पात्र घोषित प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी व शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने ‘पवित्र’ (पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टीचर रिक्रूटमेंट) या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक निवडीसाठीची पारदर्शक पद्धती तयार केली आहे. 

अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीत मिळालेल्या गुणांच्या आधारावर यापुढे शिक्षण सेवकांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे शिक्षक भरतीसाठी आणखी एका परीक्षेची भर पडली आहे. हे सर्व सोपस्कार पार पडतात; परंतु भरती प्रक्रिया राबविली जात नसल्याने इच्छुकांमध्ये निराशा आहे.

भावी शिक्षकांना निकालाची ओढ
जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या टीईटी परीक्षेस पेपर क्रमांक एकसाठी तीन हजार ४२३ पैकी तीन हजार १८० परीक्षार्थी बसले, तर २५१ परीक्षार्थी गैरहजर राहिले होते. पेपर क्रमांक दोनसाठी तीन हजार ४२२ पैकी तीन हजार २०० उमेदवारांनी परीक्षा दिली, तर २२७ परीक्षार्थी गैरहजर राहिले होते. या सर्व परीक्षार्थींना निकालाची ओढ लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com