किशोरींची होणार मासिक पाळीबाबत जागृती

किशोरींची होणार मासिक पाळीबाबत जागृती

सातारा - मासिक पाळीदरम्यान सुमारे १२ टक्के किशोरवयीन मुली या शाळेत गैरहजर असतात, अशी धक्कादायक बाब पुढे आल्यावर राज्यात शालेय स्तरावर मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षण देत जागृती करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.

केंद्राच्या ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय’ या उपक्रमांतर्गत राज्यातील उच्च प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमध्ये मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे. त्यासाठी स्वच्छ विद्यालय, स्वच्छ महाराष्ट्र टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार आहे. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महापालिका आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी व पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्‍चित करण्यात आली आहे. या क्षेत्रात कार्यरत अभ्यासूंना समितीवर निमंत्रित करण्यात येणार आहे. कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना मासिक पाळी व्यवस्थापन प्रशिक्षणात तडजोड न करण्याची जबाबदारी आहे. 

या दलात नियुक्त महिला प्रतिनिधींचे पहिल्या टप्प्यात राज्यस्तरीय प्रशिक्षण होईल. या प्रशिक्षित महिला जिल्ह्यातील सर्व महिला शिक्षकांचे प्रशिक्षण घेतील. हे व्यवस्थापन प्रशिक्षण सहा सत्रात होईल. मासिक पाळीविषयी समज निर्माण करणे, पाळीदरम्यान उद्भवलेल्या आव्हानांना हाताळणे, त्या दिवसातील स्वच्छता व आरोग्य योग्य पद्धतीने हाताळणे, अंधश्रध्दा दूर करणे व सल्ला या अनुषंगाने हे प्रशिक्षण होईल. प्रशिक्षणादरम्यान मुलींना मार्गदर्शन करण्यावर भर राहणार आहे.

प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वतंत्र शौचालय व स्वच्छतागृहे असण्यावर कटाक्ष आहे. त्यात मुलींना कपडे बदलण्याची सोय, वापरलेली शोषके टाकण्यासाठी कचराकुंडी, हात धुण्यासाठी साबण, आरसा व वापरलेली शोषके नष्ट करण्याची व्यवस्था अशी सुविधायुक्त शौचालये आवश्‍यक ठरणार आहेत. शोषक (सॅनिटरी पॅड, सुती कापड) व अन्य वस्तूंची उपलब्धता करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांवर राहणार आहे.

ठाणे, जालन्यासह अन्य पाच जिल्ह्यांत प्रात्यक्षिक तत्त्वावर हा उपक्रम यशस्वी झाल्यावर त्याची व्याप्ती वाढविताना आता पालकांनाही सहभागी करून घेण्याचे मंत्रालयाने निश्‍चित केले. याबाबत घरीसुद्धा मुलींच्यात जागृती करण्यासाठी माता पालक संघ, किशोरी मंच, शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाईल. प्रत्येक शाळेत पेयजल व्यवस्था, मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, हात धुण्याची व्यवस्था व अपंगांसाठी स्वच्छतागृहे या बाबी स्वच्छ विद्यालय कार्यक्रमात अंतर्भूत होत्या. मासिक पाळी व्यवस्थापनात या अनुषंगिक बाबी उपलब्ध करून ठेवणे शाळा व्यवस्थापनासाठी अनिवार्य ठरणार आहे.

‘युनिसेफ’च्या अहवालाने शासनाला जाग
मासिक पाळीमुळे मुलींची होणारी कुचंबणा व शैक्षणिक नुकसान आता शासनाने प्रमुख समस्या मानली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार १२ टक्के मुली पाळीदरम्यान शाळेत गैरहजर असतात. या समस्येविषयी भारतात उघडपणे बोलणेही टाळले जाते. ‘युनिसेफ’ने महाराष्ट्रात केलेल्या पाहणीनुसार ११ ते १९ वयोगटातील केवळ १३ टक्के मुलींना पहिली पाळी येण्याअगोदर पाळीबाबत माहिती होती. या अहवालानेच शासनाला या आरोग्य समस्येची जाणीव झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com