‘सुगम-दुर्गम’ने शिक्षक ‘गॅस’वर!

‘सुगम-दुर्गम’ने शिक्षक ‘गॅस’वर!

सातार - जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचे धोरण बदलल्याने बहुतांश शिक्षकांच्या शिट्ट्या वाजल्या आहेत. सुगम व दुर्गम शाळा निश्‍चित करून दुर्गम भागातील शाळांवर तीन वर्षांहून अधिक काम करणाऱ्यांना सुगम शाळांमध्ये बदली करण्याचे धोरण असल्याने बदलीस पात्र सुजलाम-सुफलाम भागातील शिक्षक ‘गॅस’वर आहेत. त्यात या बदल्या पूर्णपणे ऑनलाइन पध्दतीने होत असल्याने वशिलेबाजांची पाचावर धारण बसली आहे. 

शिक्षकांच्या बदल्यांबाबत सातत्याने वशिलेबाजी, संघटनांची दादागिरी होत असल्याने ग्रामविकास व शिक्षण संचालनालयाने शिक्षक बदलीचे सुधारित धोरण राबविले आहे. दुर्गम भागात तीन वर्षांहून अधिक काम करणाऱ्या शिक्षकांना सुजलाम-सुफलाम भागातील म्हणजे ‘सुगम’ शाळांत बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने होत असल्याने दादागिरी, वशिलेबाजी करणाऱ्या शिक्षकांना दुसरा मार्गच राहिला नाही. प्रथम दुर्गम भागातील बदलीस पात्र शिक्षक थेट २० शाळांची यादी ऑनलाइन भरणार आहेत. त्यामुळे सुगम शाळांत दहा वर्षे नोकरी केलेल्या शिक्षकांना दुर्गम भागात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. अतिदुर्गम व दुर्गम भागात आपल्या कुटुंबापासून दूर राहून काम करणाऱ्या शिक्षकांना नव्या निर्णयामुळे आपल्या कुटुंबाच्या सहवासात राहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे दुर्गम भागातील शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, सुगम शाळांमध्ये सातत्याने काम करणाऱ्या शिक्षकांना दुर्गम भागात जावे लागणार असल्याने ते सध्या ‘गॅस’वर आहेत. 

गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत सुगम, दुर्गम शाळा निश्‍चित केल्या आहेत. त्यानंतर त्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत अंतिम केल्या जातील. मात्र, या शाळा निश्‍चित करताना शिक्षण विभागापुढेही अडचणी वाढल्या आहेत. काही शाळा सपाटीवर असतात. मात्र, त्या गावांत एसटी जात नसेल तर, ती शाळा दुर्गम की सुगम, असे कोडेही पडत आहे. जिल्ह्यातील २७०० पैकी सुमारे ४०० हून अधिक शाळा निश्‍चित दुर्गम होण्याची शक्‍यता आहे. 

काय आहे निर्णय... 

शिक्षकांच्या बदली प्रक्रियेतील किचकटपणा घालवून अवघड आणि सामान्य क्षेत्र अशी शाळांची विभागणी करत सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. वाहतूक आणि दळणवळण या निकषांनुसार शाळा सुगम आणि दुर्गम ठरविल्या जातील. दुर्गम घोषित झालेल्या शाळेत किमान तीन वर्षे सेवा पूर्ण झालेला शिक्षक सुगम म्हणून घोषित केलेल्या कोणत्याही शाळेचे बदलीसाठी नाव सूचित करू शकतो. यासाठी किमान २० सुगम शाळांचा पर्याय दिला आहे. सुगम किंवा सामान्य क्षेत्रात ज्यांची दहा वर्षे सेवा झाली आहे, अशा शिक्षक कर्मचाऱ्यांना विनाअट दुर्गम भागात बदलीने जावे लागेल. मात्र, सुगम भागातील अपंग, दुर्धर आजार, विधवा, माजी सैनिक पत्नी, कुमारिका, मतिमंद पाल्याचे पालक, ५३ वर्षे सेवा पूर्ण अशा शिक्षकांना प्रक्रियेतून वगळले आहे. 

संघटना पुराण बंद
यापूर्वी शिक्षक बदल्यांत शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना सूट दिली जात असे. त्यामुळे संघटनांचे फावत असे. बदलीपासून सुटका मिळविण्यासाठी संघटनांत जिल्हास्तरीय पदांनाही उधाण आले होते. यावेळी मात्र संघटनांना सवलत दिली नसल्याने बहुतेकांची ‘पुढारकी’ आता दुर्गम भागात दिसणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com