सोलापूर - राज्यातील अनेक शेतकऱ्यांना कृषिपंपांचे वीजबिलच दिलेले नाही. त्यामुळे थकबाकीची माहितीच शेतकऱ्यांना नाही. येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत चालू वीजबिल भरण्याचे आवाहन सरकारने केले आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व शेतकऱ्यांना विजेची बिले पोचविण्याचे मोठे आवाहन "महावितरण'पुढे आहे. दरम्यान, महावितरणने वीजतोडणीची मोहीम थांबवून वसुलीची मोहीम सुरू ठेवली आहे.
पाच अश्वशक्तीची विद्युत मोटार असलेल्या शेतकऱ्याकडे पाच हजार रुपये भरण्याचे आवाहन महावितरणकडून केले जात आहे. येत्या 15 नोव्हेंबरपर्यंत जे शेतकरी चालू वीजबिल भरणार नाहीत, त्या शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे. शेतकरी वीजबिल भरत नाहीत हे डोळ्यासमोर ठेवून महावितरणच्या वतीने विजेची बिलेच वाटली जात नाहीत. थकबाकी वाढल्यानंतर वसुली करण्याबाबत महावितरणला जाग येते. त्यानंतर थेट शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे हत्यार महावितरणकडून उपसले जाते. नियमित शेतकऱ्यांकडे बिलाची मागणी केली तर थकबाकीमध्ये निश्चितच मोठा फरक पडू शकतो. मात्र त्याबाबत महावितरणची यंत्रणा खूपच तोकडी पडत असल्याचे दिसून येते.
सोलापूर जिल्ह्यात शेतीपंपाचे तीन लाख 56 हजार ग्राहक आहेत. त्यापैकी 35 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. चालू बिल भरण्यासाठी त्यांना मुदत दिली आहे. आतापर्यंत 47 लाख रुपयांची वसुली झाली आहे. वीजबिल भरण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले जात आहे.
- ज्ञानदेव पडळकर, अधीक्षक अभियंता, महावितरण
|