सोलापूर - उसाचे गाळप करण्यासाठी साखर कारखान्यांना गाळप परवान्याचा प्रस्ताव सादर केल्यानंतर त्यांना परवाना प्राप्त होण्यास प्रशासकीय विलंब होऊ नये, यासाठी यंदाच्या गाळप हंगामापासून साखर कारखान्यांचा गाळप परवाना ऑनलाइन पद्धतीने देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे दिली.
वाशी, नवी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक मर्यादित या बॅंकेच्या वतीने झालेल्या बॅंकेने कर्जपुरवठा केलेल्या सहकारी साखर कारखान्यांच्या एकदिवसीय कार्यशाळेत त्यांनी ही माहिती दिली. साखर आयुक्त गिरिधर पाटील, बॅंकेचे प्रशासक डॉ. सुखदेवे, कार्यकारी संचालक, प्रमोद कर्नाड व राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, 'राज्यातील मर्यादित सिंचन क्षमता व ऊस पिकासाठी पाण्याचा होणारा अतिरिक्त वापर ही बाब विचारात घेऊन सर्व साखर कारखान्यांनी ऊसतोडणीसाठी ठिबक सिंचनाचा सक्तीने वापर करण्याबाबत सभासदांना प्रवृत्त करावे. शासनाने हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार हा महत्त्वाकांक्षी उपक्रम साखर कारखान्यांच्या परिसरात राबविण्यासाठी सर्व कारखान्यांनी पुढाकार घ्यावा.'' साखर कारखान्याच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या ठिबक सिंचन प्रकल्पास महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेमार्फत निश्चित केलेला 11.5 टक्के व्याज दर कमी करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
|