सोलापूर - किमान पंधरा वर्षे कोणत्याही प्रकारचे खड्डे पडणार नाहीत अशा रस्त्यांची निर्मिती महाराष्ट्रात केली जाणार आहे, अशी माहिती महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी दिली.
पाटील म्हणाले, 'भारतमाला योजनेअंतर्गत सहा हजार कोटी रुपये मिळाले आहेत. त्यातून राज्यातील राष्ट्रीय महामार्गांवर सहा पदरी आणि चार पदरी रस्ते तयार होतील. किमान पंधरा वर्षे या रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत अशा पद्धतीचे ते तयार केले जाणार आहेत.
राज्यातील 34 जिल्ह्यांचा प्रवास मी करीत आहे. आतापर्यंत 24 जिल्हे फिरून झाले आहेत. यापूर्वी रस्त्यासाठी मुबलक तरतूद नसल्याने रस्ते चांगले झाले नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात खड्डे पडणे आणि ते डिसेंबरमध्ये बुजविणे हे नेहमीचे आहे. विरोधकांनी यंदा त्याचा जास्त बाऊ केला. येत्या 15 डिसेंबरपर्यंत राज्य, राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे शंभर टक्के भरू.''
'येत्या दोन वर्षांत राष्ट्रीय महामार्गाचे 22 हजार किलोमीटरपर्यंतचे रस्ते मंजूर झाले. त्याला 1 लाख 6 हजार कोटी रुपये केंद्र सरकारने मंजूर केले. तीन वर्षांत ही रक्कम मिळेल. या वर्षीची रक्कम उपलब्ध झाली आहे. राज्य सरकारने इतिहासात पहिल्यांदा रस्त्यांसाठी 30 हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यातून 10 हजार किलोमीटरचे रस्ते होतील. म्हणजेच एकूण 38 हजार किलोमीटरचे रस्ते होतील,'' असे पाटील यांनी सांगितले.
|