निम्म्याहून अधिक सोलापूरला पाणीपुरवठा करणारा उजनी जलाशय शंभर टक्के भरला तरी शहरवासीयांना आठवड्यात एकदा पाणी मिळतेय! एकीकडे असा प्रकार असला तरी दुसरीकडे पाणीपट्टीची वसुली मात्र पूर्ण केली जातेय. आजपर्यंतचे हे ठीक होतं. सहनशील सोलापूरकर महापालिकेच्या नियोजनाअभावी होणारा हा प्रकार निमूटपणे सहन करीत होते. परंतु महापालिकेने आता नवाच फंडा काढत नळ (पाणी) चोरांसाठी केवळ 10 हजारांच्या दंडावर भागवून (ऍडजेस्टमेंट) त्यांना पाठीशी घालण्याचा नियोजित कटच आखत असल्याचा संशय येत आहे.
महापालिकेकडून शहरवासीयांना पाणीपुरवठ्याची सेवा दिली जाते. परंतु या अत्यंत महत्त्वाच्या सेवेबाबत महापालिका सक्षमच नाही असे म्हणावे लागेल. उजनी जलाशय दरवर्षी शंभर टक्के भरतो. त्यातील पाण्याच्या नियोजनाची बाब तर फारच चिंतनाचा विषय आहे. सोलापूरकरांसाठी मिळणाऱ्या पाण्याचे नियोजनच दरवर्षी चुकते की चुकविले जाते, याबाबत साशंकताच आहे. मातब्बर व महाबली नगरसेवकांच्या प्रभागात पाण्याचा सुकाळ दिसतो. परंतु ज्या भागातील नेतृत्व कुचकामी आहे, तेथे मिळणाऱ्या पाण्याचा दाबही कमीच! असा प्रकार नेहमीच पाहायला मिळतो. अनेक जलकुंभाअभावी नियोजनाचे गणित चुकत असल्याची कबुली प्रशासन देते.
एकीकडे हे सारे होत असताना दुसरीकडे मात्र महापालिकेने आता नवीनच फंडा काढला आहे. पाणीचोर अथवा नळचोरांविरुद्ध कडक मोहीम हाती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना केवळ 10 हजारांच्या दंडावर भागवून नळ कनेक्शन सुरळीत (ऍडजेस्टमेंट) करून देण्याचा ठराव गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला आहे. चोरांना पाठीशी घालण्याचे अनेक प्रकार महापालिकेत होत असलेले पाहतो. आता त्यावर हा एक कळसच म्हणावा लागेल. एक तर कारवाई नाहीतर मोठ्या दंडाची आकारणी होण्याची गरज आहे. नाही तर काळ सोकावेल...! बस्स इतकंच ..!
महापालिकेचा कारभार!
सोलापूर शहरास पूर्वी एकेकाळी 24 तास पाणीपुरवठा होत होता. तेव्हा वर्षाला पाणीपट्टीची आकारणी होत होती 215 रुपये. नंतर दिवसातून दोनवेळा म्हणजे सकाळ-संध्याकाळ पुरवठा होणाऱ्या पाण्यासाठी आकारणी केली जात होती... 700 रुपये! पाणीपुरवठ्यावर हळूहळू संक्रांत येऊ लागली. दिवसभरात एकदाच सकाळी येणाऱ्या पाण्यासाठी महापालिकेने प्रतिवर्ष 1225 रुपयांची आकारणी सुरू केली. नंतर दोन दिवसांतून एकवेळ येणाऱ्या पाण्यासाठी 1800 रुपये... चार दिवसांतून एकवेळ येणाऱ्या पाण्यासाठी 2400 रुपये..! आता आठवड्यातून एकवेळ (महापालिकेचा दावा चार दिवसांतून एकवेळ) येणाऱ्या पाण्यासाठी 2756 रुपयांची आकारणी केली जात आहे. अलीकडील काळात नेमके पाणी किती आणि नेमकी पाणीपट्टी किती? असाच सवाल निर्माण होऊ लागला आहे.
वार्षिक पाणीपट्टी (रुपयांमध्ये)
1964-88 ः 75 ते 150
1988 ः 175
1990-91 ः 215
91-92 ः 300
92-93 ः 420
93-95 ः 530
95-97 ः 700
1997 - 2002 ः 980
2002-03 ः 1,225
2003-05 ः 1,470
2005-10 ः 1,764
2010-11 ः 2,205
2012 पासून ः 2,756
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.