सोलापूर - विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येत आहे. अभ्यासक्रमात बदल करताना सुसूत्रता आणणे हा महत्त्वाचा उद्देश आहे. नव्या अभ्यासक्रमात काय असणे अपेक्षित आहे, यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सूचना देण्याचे आवाहन केले आहे.
इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात बदल करणे आता अत्यावश्यक बनले आहे. देशाची व्यवस्था चांगल्या पद्धतीने चालण्यासाठी चांगले नागरिक बनण्याची आवश्यकता असते, हे फक्त शिक्षणाच्या माध्यमातूनच केले जाऊ शकते, असे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सांगितले आहे.
विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासोबतच जीवनमूल्ये, अनुभवावर आधारित शिक्षण, शारीरिक शिक्षण, नवे शोधण्याची वृत्ती यांचे ज्ञान मिळणे गरजेचे आहे. सध्या अशी एक शिक्षण व्यवस्था तयार करायची असून, यातून विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य जोपासण्यासाठी त्यात वाढ करण्याची संधी मिळावी, असा याचा उद्देश आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडत्या क्षेत्रामध्ये भविष्य घडविण्यासाठी हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मागील काळापासून अनेकदा अभ्यासक्रमात बदल करावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. कारण सध्याचा अभ्यासक्रम हा जड तसेच विद्यार्थ्यांच्या वयोगटाला साजेसा असा नाही.
मत नोंदवण्याचे आवाहन
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन, शिक्षणतज्ज्ञ, पालक, विद्यार्थी तसेच सामाजिक संस्था यांनी आपले मत नोंदवावे, असे आवाहन केले आहे. सहा एप्रिलपर्यंत http://164.100.78.75/DIGI या संकेतस्थळावर विहित नमुन्यात आपल्या सूचना नोंदवाव्यात, असे सांगितले आहे. दिलेल्या सूचना या गोपनीय असणार ठेवण्यात येणार आहेत.
|