सोलापूर - संपामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वेठीस धरू नका, असे आवाहन राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी केले.
सोलापूर स्मार्ट सिटी अभियानंतर्गत येथे आयोजित कार्यशाळेचे उद्घाटन देशमुख यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. देशमुख म्हणाले,""या आंदोलनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. लाखो लिटर दूध रस्त्यावर ओतले जात आहे. पालेभाज्याही फेकल्या जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचेच मोठे नुकसान होत आहे. संपाबाबत तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चर्चेसाठी तयार आहेत. चर्चेच्या माध्यमातून याबाबत सकारात्मक तोडगा निघू शकतो. संघटनांनी शेतकऱ्यांचे नुकसान वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत.''
दुधाचा भाव किती असावा, हे अनेक संघ स्वतःहून निश्चित करतात. दुधाच्या हमी भावाबाबत राज्यातील दूध संघ आणि सरकारच्या बैठकीत चर्चा होऊन निर्णय होऊ शकतो, असेही देशमुख यांनी नमूद केले.
|