सोलापूर - गेल्या पंधरा दिवसांपासून ऊसदराच्या प्रश्नावरून सोलापूर जिल्ह्यात शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या. त्याने आंदोलनाची धग वाढली होती. त्यावर आज सायंकाळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल साखर कारखान्याने शेतकरी संघटनांनी दिलेला "एफआरपी' वर 400 रुपये, असा प्रस्ताव स्वीकारल्यामुळे जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी काही अंशी फुटली आहे.
भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा कारखान्याचे संचालक शहाजी पवार, कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, रयत संघटनेचे दीपक भोसले, मनसेचे दिलीप धोत्रे, जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख, बळिराजा शेतकरी संघटनेचे संजय पाटील-घाटणेकर, रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेचे शंकर गायकवाड, महामूद पटेल, उमाशंकर पाटील, विश्रांती भुसनर, राजाराम जगदाळे यांची बैठक घेऊन ऊसदरासंबंधी चर्चा केली. त्यानंतर घाटणेकर व गायकवाड वगळता उर्वरित संघटनांनी बैठकीत झालेला निर्णय मान्य केला. मात्र घाटणेकर व गायकवाड यांना निर्णय मान्य न झाल्याने ते बैठक सोडून निघून गेले.
स्वाभिमानीचे नेते तुपकर म्हणाले, की सहकारमंत्र्यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर, सांगलीमध्ये एफआरपी आणि 200 रुपये मिळाले. सोलापुरात एफआरपी आणि 400 रुपये मिळाले आहेत. अन्य कारखान्यांनी या पद्धतीने दर द्यावा, अन्यथा संबंधित कारखान्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी सहकारमंत्र्यांकडे करू. आम्ही मागील काही दिवसापासून सुरू केलेले हे आंदोलन स्थगित केले आहे. जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी जर ठरलेला दर न दिल्यास पुन्हा आंदोलन सुरू केले जाईल. |
|