भाजपच्या प्रदेश सरचिटणिसांचे जिल्हाध्यक्षांना पत्र
सोलापूर - राज्यात गेल्या वर्षी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या आवाहनानुसार दोन कोटी वृक्षलागवडीचा प्रयोग यशस्वी करण्यात आला होता. त्याच पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षीही चार कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रदेश सरचिटणिसांनी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षांना केले आहे.
गेल्या वर्षी सरकारी यंत्रणा, नागरिक व भाजप कार्यकर्त्यांमुळे दोन कोटी 83 लाख इतके वृक्ष लावण्यात आले होते. या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. त्याच धर्तीवर यंदाही वृक्षलागवड होणे अपेक्षित आहे. यंदा चार कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 1 ते 7 जुलै या कालावधीत हे वृक्ष लावले जाणार आहेत. या उपक्रमामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन प्रदेश सरचिटणीस रवींद्र भुसारी यांना जिल्हाध्यक्षांना पत्राद्वारे केले आहे. भारतीय वंशाच्या वृक्षाचे संगोपन करण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याबाबतही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
मागचेही व्हावे अवलोकन
मागील वर्षी दोन कोटी 86 लाख एवढी झाडे लावण्यात आली हे सत्य नाकारून चालणार नाही. मात्र, आता त्या झाडांची स्थिती काय आहे, याचेही अवलोकन होणे गरजेचे आहे. यंदाच्या वृक्षलागवडीच्या वेळी मागील वर्षीच्या खड्यामध्ये रोप लावण्याची वेळ येऊ नये, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमी व्यक्त करीत आहेत.
|