सोलापूर - उजनी धरणातून भीमा नदी, कालवा व बोगद्याच्या माध्यमातून 45 हजार 400 क्सुसेकने पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. दुपारी चार वाजता धरणाची उपयुक्त पाण्याची टक्केवारी 99.67 इतकी होती. दौंड येथून धरणात 70 हजार 399 क्युसेकने पाणी येत आहे.
पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे त्याठिकाणी सगळी धरणे शंभर टक्के भरली आहेत. पुणे जिल्ह्यातील धरणे भरल्यामुळे त्या धरणातून नदीपात्रामध्ये पाणी सोडले जात आहे. ते पाणी उजनी धरणात येत आहे. दुपारी चार वाजता 99.67 टक्के असलेले धरण काही तासांमध्ये 100 टक्के भरेल. धरणात मागील वर्षी 61.60 टक्के उपयुक्त पाणीसाठा होता. गेल्या वर्षीची तुलना करता यंदा धरण खूपच आधी 100 टक्के भरले आहे.
धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी भीमा नदीमध्ये सोडण्यात येत असल्यामुळे नदीकाठी असलेल्या गावांमध्ये दक्षतेचा इशारा धरण प्रशासनाने मंगळवारीच दिला होता. आज दुपारपासून जवळपास 41 हजार 500 क्युसेकने पाणी भीमा नदीमध्ये सोडले जात आहे. कालव्यातून तीन हजार, बोगद्यातून 900 क्सुसेकनेही पाणी सोडले जात आहे.
उसाच्या लागवडीत वाढीची शक्यता
उजनी धरणातील पाण्याच्या जोरावर जिल्ह्यात प्रामुख्याने उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ऊस पट्ट्यातील शेतकऱ्यांना धरण 100 टक्के भरल्याने आनंद झाला आहे. त्यामुळे उसाच्या लागवडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
|