सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत यांच्यात सध्या दुरावा वाढतोच आहे. पुण्यात "स्वाभिमानी'च्या बैठकीकडे मंत्री खोत यांनी पाठ फिरवली होती. दोघांनी एकमेकांची भेटही घेतली नाही. या पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री खोत यांनी "स्वाभिमानी शेतकरी संघटना एकसंधच आहे, चिंता नसावी' असे शुक्रवारी स्पष्ट केले.
संघटनेत सुरू असलेल्या अंतर्गत धुसफुशीबद्दल बोलताना खोत म्हणाले, 'पुण्यात माझी शासकीय बैठक होती. त्यामुळे संघटनेच्या मेळाव्यास मी हजर राहिलो नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटना एकसंध आहे. चिंता करू नका.'' जिल्हा परिषदेत कुणाला पाठिंबा देणार, यावर बोलताना ते म्हणाले, 'जिल्हा परिषदेत पाठिंबा देण्याबाबत रयत विकास आघाडीचे नेते आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, निशिकांत पाटील आदी सर्वजण एकत्र बसून निर्णय घेऊ.'' निकालाच्या दिवशीच रयत विकास आघाडी भाजपला पाठिंबा देईल, असे म्हटल्याची आठवण करून दिली असता ते म्हणाले, की वाळवा तालुक्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात आम्ही एकत्र लढलो होतो. त्यामुळे योग्य निर्णय घेऊ, असे माझे यापूर्वीही मत होते. अजून अध्यक्ष निवडीला वेळ आहे. त्याबाबत सर्वजण एकत्र बसून निर्णय घेऊ.''
व्हॉट्सऍप' मला येत नाही
सध्या सदाभाऊ खोत स्वाभिमानीशी संबंधित असलेल्या व्हॉट्सऍप ग्रुपमधूनही बाहेर पडत आहेत. याबाबत विचारले असता ते म्हणाले, ""मला व्हॉट्सऍप येत नाही. मी वापरत नाही, बघत नाही. त्यामुळे बाहेर पडायचा प्रश्नच नाही.''
प्रश्न टाळण्याचा प्रयत्न
कृषी महोत्सवाची आणि सरकारच्या निर्णयाची माहिती दिल्यानंतर मंत्री खोत यांनी पत्रकार बैठक आवरती घेण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांनी त्यांना "स्वाभिमानी'मधील सध्याच्या हालचालींबाबत विचारले असता साताऱ्याला जायचे असल्याचे कारण सांगत त्यांनी मोजकीच उत्तरे देत काढता पाय घेतला.
|