श्रीरामपूर - 'सध्याचे भांडवलदारधार्जिणे सरकार शेतकरीविरोधी धोरणे राबविण्यात दंग आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीड पट हमीभावाची घोषणा करून सत्तेत आल्यानंतर त्यांनी विश्वासघात केला. स्वामिनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्याच्या मागणीसाठी सुकाणू समिती राज्यभर "जेल भरो' आंदोलन करणार आहे,'' अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिली.
शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीतर्फे शहीद अभिवादन व शेतकरी जागर यात्रा काढण्यात आली आहे. गोवर्धनपूर येथील हुतात्मा रामचंद्र धंदेवार यांच्या स्मारकाला अभिवादन करून ही यात्रा येथे आली. बाजार समितीच्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील शेतकरी सभागृहात झालेल्या शेतकरी मेळाव्यात पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले, 'भविष्यात उसाचे क्षेत्र वाढणार आहे. उसाला किमान किफायतशीर मूल्यानुसार (एफआरपी) भाव दिला पाहिजे; पण कारखाने वेळेवर पैसे देत नाहीत. कायद्यानुसार कारखान्यांनी 14 दिवसांत पैसे न दिल्यास ते राज्य सरकारने द्यायला हवेत, यासाठी संघर्ष करावा लागेल. सरकारने दुधाला 27 रुपये लिटर दर ठरवून दिला असताना एवढा भाव कधीच शेतकऱ्यांना मिळाला नाही. दूध संघ भांडवलदारांचे आहेत. ते नियमाप्रमाणे भाव देत नाहीत, तरीही त्यांच्यावर सरकार कारवाई करीत नाही. यामागे काय गौडबंगाल आहे? शेतमालावरील निर्यातबंदी उठविली जात नाही. उद्योगपतींच्या फायद्यासाठी शेतमालाला कमी भाव दिला जातो.''
|