खासदारकीच्या चक्रव्यूहात उदयनराजे!

खासदारकीच्या चक्रव्यूहात उदयनराजे!

सातारा - महाराष्ट्र गर्जे, उदयनराजे... खासदार उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांची ही आवडीची घोषणा. मात्र, राज्य पातळीवरील राजकारणाचा मोठा कॅनव्हास उपलब्ध असतानाही उदयनराजे हे फक्त साताऱ्यातच गर्जत आहेत. राज्याच्या राजकारणाची दिशा बदलण्याची ताकद असलेल्या व्यक्तिमत्त्वाला खासदारकीमध्येच गुंतवून ठेवण्याच्या चक्रव्यूहात ते फसताना दिसतात. चक्रव्यूह भेदण्याची धडपड करण्यापेक्षा चक्रव्यूह आखण्याचा त्यांचा गनिमी कावा सध्याचे राजकीय चित्र बदलू शकतो.

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातारा पालिकेच्या कारभारावर आक्षेप घेणारी पत्रकार परिषद घेतली. त्याला उदयनराजेंनीही उत्तर दिले. 

त्या वेळी ‘मी डावपेच करत नाही, फक्त माझ्यावर टाकलेल्या डावातून बाहेर पडत असतो, तो उलटवत असतो,’ असे उदयनराजे हे प्रांजळपणे बोलून गेले. त्यातील सगळेच काही चुकीचे नाही. 

राष्ट्रवादीत एक गट विरोधात
जिल्ह्याच्या राजकारणातील वर्चस्ववादात राष्ट्रवादीच्या धुरिणांना केवळ उदयनराजेंचेच आव्हान राहिले आहे. जिल्ह्यात काय घडेल ते आमच्यामुळेच, अशी मानसिकता असलेल्या या नेत्यांना राष्ट्रवादीतीलच दुसऱ्या कुणाचेही वाढते वर्चस्व खपत नाही. अगदी आमदार शशिकांत शिंदेही या अंतर्गत हल्ल्यातून सुटलेले नाहीत. या वर्चस्वाला उदयनराजे हादरा देऊ शकतात, याची भीती कायम एका गटातील नेत्यांच्या मनात दबून राहिलेली आहे. उदयनराजेंच्या अनेक कृतीतून आणि त्यांना इतर पक्षांतून त्या-त्या वेळी मिळणाऱ्या पाठिंब्यावरून हे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेची सत्ता असो किंवा विधान परिषद निवडणुकीत सहज बाजी मारू म्हणणाऱ्यांना त्यांनी नाकीनऊ आणले. 

नामी संधी सोडली
जिल्ह्याच्या सत्ताकारणात बाजी मारण्याच्या नादात या काळात राज्याच्या सत्तेच्या पटात बाजी मारण्याची संधी उदयनराजेंनी सोडली. मराठा मोर्चाचा शेवटचा एल्गार मुंबईत झाला. संपूर्ण महाराष्ट्र आझाद मैदानावर उदयनराजेंच्या एन्ट्रीकडे डोळे लावून होता. मात्र, राजे आलेच नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीमुळे उदयनराजे थांबले, असा मेसेज काही काळ उदयनराजेप्रेमींच्या ग्रुपवर आला. टीकेचा सूर आल्यावर तो काढून घेण्यात आला. राजकीय  आयुष्यात एखाद्याच वेळी येत असलेली संधी उदयनराजेंनी दवडली. जिल्ह्यातील डावपेचांत अडकल्यानेच त्यांना ते करावे लागले, हे तितकेच खरे आहे. परंतु, त्यामुळे संपूर्ण समाजाला खेळवण्याची संधी सरकारला मिळाली.

लोकांना हवाय पर्याय...
आताही परिस्थिती फारशी बदललेली नाही. मराठा समाजाच्या मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. सरकारच्या उपाययोजनांबाबत समाधान नाही. धनगर आरक्षणाचा प्रश्‍नही लोकांच्या मनात धुमसत आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय होत नाहीत. 

जाती-जातींमध्ये संशयाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत या सर्व प्रश्‍नांना ठामपणे मांडणारा पयार्य लोकांसमोर नाही. कोणामागे उभे राहायचे, याचा संभ्रम लोकांत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावात, त्यांच्या गादीत ती शक्ती आहे. त्यामुळे खासदारकीच्या चक्रव्यूहात अडकायचे, की राज्याच्या राजकारणाचा चक्रव्यूह रचायचा? हे उदयनराजेंनाच ठरवावे लागेल.

आर्थिक सत्तास्थानांचाही वाद
राजकीय सत्तास्थानाबरोबरच आर्थिक सत्तास्थानांचाही हा वाद आहे. जिल्ह्यात आलेल्या नवीन उद्योगांची मॅनेजमेंट कोणाच्या ताब्यात, हाही गेल्या वर्षभरात जिल्ह्यात झालेल्या राजकीय उलथापालथींना कारणीभूत आहे. उद्योगांची मॅनेजमेंट हातात आली की कमाईही होते आणि नोकरीच्या निमित्ताने युवा वर्गाला जवळ ठेवता येते. सध्या त्यात फलटणकरांचे मॅनेजमेंट चांगले आहे. त्यात इतर आमदारांनाही काही प्रमाणात त्यांच्या मर्जीने शिरकाव करता येतो. मॅनेजमेंटच्या या सत्ता-संघर्षाचाच भाग लोणंदच्या सोना अलाइज कंपनीच्या प्रकरणात उदयनराजेंनी अनुभवला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com