मुबलक पाणी मिळणार तरी कधी?

मुबलक पाणी मिळणार तरी कधी?

कोल्हापूर - प्राधिकरणात समाविष्ट असणारे महत्त्वाचे गाव म्हणजे उचगाव होय. गावची लोकसंख्या ४० हजारांवर गेली आहे. नागरिकांना एक दिवसआड ४५ मिनिटे पाणीपुरवठा होताे. अधूनमधून त्याही पाण्याला दांडी असते.

पिण्यासाठी चांगले स्वच्छ दूधगंगा नदीचे पाणी मिळते. ही जमेची बाजू आहे; पण हे पाणी मुबलक प्रमाणात मिळावे, अशी लोकांची मागणी आहे.
कोल्हापूर शहरालगत मोठा विस्तार असणारे हे गाव आहे. आजूबाजूला दोन औद्योगिक वसाहती, गावातूनच गेलेला राष्ट्रीय महामार्ग, कोल्हापूर-मिरज रेल्वेमार्ग तसेच कोल्हापूर, हुपरी हे प्रमुख रस्ते या गावातून गेले आहेत.

घाटगे पाटील इंडस्ट्रीजसह मेनन ॲंड मेनन व अन्य काही कारखान्यामुळे येथे कामगारवर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. गावाचा विस्तार वाढत आहे. शाळा, कॉलेज आदी शैक्षणिक सुविधाही येथे उपलब्ध आहेत. उचगाव मूळ गावठाण, निगडेवाडीसह मंगेश्‍वर कॉलनी, प्रियदर्शनी कॉलनी, बाबा नगर, मणेर मळा, उचगाव पूर्व भाग, शांतीनगर आदी परिसरात गावाचा विस्तार वाढला आहे. गावाला सध्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत एक दिवसआड पाणीपुरवठा होतो. मुबलक पाणीपुरवठा झाला तर या गावाची प्रगती निश्‍चितच आणखी होण्यास मदत होणार आहे. कचरा संकलन ग्रामपंचायतीमार्फत केले जाते; पण कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा प्रश्‍न आहे. स्मशानभूमीलगत रिकाम्या जागेत कचरा टाकला जातो. 

गावात बहुतांशी घरामध्ये वैयक्तिक शौचालय आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या त्रिसूत्रीमार्फत गावातील विविध विकासकामे केली जातात. अंतर्गत रस्ते डांबरीकरण करण्यासह अन्य सुविधांसाठी निधी अपुरा पडतो. गावचा विस्तार मोठा आहे. उचगाव जकात नाका ते मुडशिंगी कमान आणि मणेर मळ्यापर्यंत विस्तीर्ण जागेत दाट लोकवस्ती वाढत आहे. त्यामुळे सोयीसुविधांवर ताण पडत आहे.

याबाबत सरपंच मालूताई काळे म्हणाल्या, ‘‘प्राधिकरणामध्ये ग्रामपंचायतीचा अधिकार कायम राखणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, हा अधिकार कसा राहणार किंवा त्यांचे कार्य काय राहणार, याबाबत स्पष्टता सांगितली पाहिजे. बांधकाम परवान्यासाठी जीव मेटाकुटीला येत आहे. त्यामुळे परवान्यांचे अधिकारी ग्रामपंचायतीला दिले पाहिजेत.’’ 

उपसरपंच अर्चना विनय करी म्हणाल्या, ‘‘गावात गटर्स, पॅनेल बांधकाम तसेच रस्त्यांची कामे झाली आहेत, तसेच अजूनही रस्ते झाले पाहिजेत. यासाठी ग्रामपंचायत पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, प्राधिकरणाचा भार ग्रामस्थांना सहन होणार नाही. याचाही विचार झाला पाहिजे.’’

दृष्टिक्षेपात उचगाव
४०,००० लोकसंख्या
२६,००० मतदार

गावची ओळख  
कोल्हापूर शहरालगत मोठा विस्तार 
परिसरात दोन औद्योगिक वसाहती
कोल्हापूर मिरज रेल्वेमार्ग तसेच कोल्हापूर हुपरी हे प्रमुख रस्ते. 
घाटगे पाटील इंडस्ट्रीजसह मेनन ॲण्ड मेनन व अन्य काही कारखान्यामुळे येथे कामगारवर्ग मोठ्या प्रमाणात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com