जिल्ह्यातील सव्वादोनशे पाणी योजनांना झटका 

mseb
mseb

सांगली - वीज बिलाच्या थकबाकी वसुलीसाठी महावितरणने जिल्ह्यातील सव्वादोनशे पाणी योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिले आहेत. या योजनांकडे 4 कोटी 73 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये शेती पाणी वापर संस्था, काही पिण्याच्या पाणी योजनांचा समावेश आहे. याबाबत संबंधित उपसा जलसिंचन योजनांना वीजपुरवठा खंडित करण्याबाबत नोटिसा दिल्या आहेत. 24 फेब्रुवारीपासून या योजनांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

शेती पाणी योजनांची वीजबिलांची थकबाकी भरण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करुनही कोणताही प्रतिसाद न देणाऱ्या योजना व ग्राहकांविरोधात महावितरण आक्रमक झाले आहे. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यांत दरमहा वीजबिलांची वसुली उद्दिष्टांपेक्षा कमी झालेली आहे. जिल्ह्यातील उपसा जलसिंचनच्या 225 योजना आहेत. त्यांची थकबाकी 4 कोटी 73 लाख रुपये आहे. याबाबत महाविरणने वारंवार थकबाकी भरण्याच्या नोटिसा देऊनही याबाबत उपसा योजनांनी काही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या संस्थांची वीज खंडित करण्याच्या नोटिसा महावितरणने दिल्या आहेत. वीज खंडित करण्याचे काम आचारसंहिता संपल्यानंतर 24 फेब्रुवारी नंतर सुरू करणार असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील मोठ्या 8 पाणीपुरवठा योजनांकडे तब्बल 22 कोटी थकले आहेत. त्यापैकी जिल्हा परिषदेच्या निमणी, भिलवडी अशा दोन योजनांचा वीजपुरवठा खंडित केलेला आहे. त्यांच्याकडे 16 कोटी 71 लाखांची थकबाकी आहे. थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यासाठी महावितरणने 1 फेब्रुवारीपासून आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

या धडक कारवाईची पडताळणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची पथके स्थापन करण्यात आली आहेत. 

वसुलीत हयगय होणार नाही... 
सद्यःस्थितीत महावितरणची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट असून थकबाकी वसुलीशिवाय अन्य कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही. वसुलीअभावी वीजबिलांच्या थकबाकीत मोठी वाढ होण्याची शक्‍यता असल्याने छोट्या-मोठ्या सर्वच थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश वरिष्ठ कार्यालयांनी दिले आहेत. वसुलीत हयगय करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही संबंधितांना दिलेल्या आहेत, असे स्पष्ट करत महावितरणने या कारवाईत माघार घेतली जाणार नसल्याचे संकेत दिले आहेत. 

दृष्टिक्षेपात उपसा जलसिंचन संस्था 
मिरज ः 45 
तासगाव ः33 
इस्लामपूर ः 72 
विटा, पलूस, कडेगाव ः 24 
वाळवा, आष्टा ः 50 

जिल्ह्यातील उपसा जलसिंचन योजना, व पाणी वापर संस्थांची मोठी थकबाकी आहे. याबाबत वारंवार या संस्थांना थकबाकी भरण्याबाबत सूचना व लेखी नोटिसा देण्यात आल्या आहेत. मात्र पाणी संस्थांकडून थकबाकी भरण्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महावितरणने या योजनांची वीज खंडित करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. 

आर. डी. चव्हाण, अधीक्षक अभियंता

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com