माण तालुक्‍याची पाणीदार वाटचाल

माण तालुक्‍याची पाणीदार वाटचाल

बिजवडी - माण तालुक्‍यावर पडलेला कायम दुष्काळी हा कलंक मिटवण्यासाठी आजपर्यंत अनेकांनी प्रयत्न केले. त्यातून थोडेफार क्षेत्र सिंचनाखाली आलेही. मात्र, शासनाच्या जलयुक्त शिवार योजना व लोकसहभागातून झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे माण तालुक्‍याची टॅंकरमुक्‍तीकडे वाटचाल सुरू आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात माणमध्ये पाणीपुरवठ्यासाठी ५५ टॅंकर सुरू होते. यंदा त्यात घट होऊन फक्त दहा टॅंकरनेच पाणीपुरवठा करावा लागला.

माण तालुक्‍याची ओळख तशी दुष्काळी तालुका म्हणूनच आहे. हा दुष्काळ हटवण्यासाठी राज्यकर्त्यांनी प्रयत्न करूनही प्रश्‍न सुटला नव्हता. आघाडी शासनाच्या काळात आमदार जयकुमार गोरे व सध्याच्या काळात सत्ताधारी भाजपच्या नेते मंडळींच्या पाठपुराव्यामुळे सिंचन योजनांना थोडी फार गती मिळाल्याने काही भागात पाणी आले. 

शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानातून झालेल्या कामांमुळेही पाणीसाठ्यात वाढ होत आहे. २०१५ पासून मे २०१८ या कालवधीपर्यंत किती  तरी पटीने टॅंकरची मागणी घटत असून हेच जलसंधारणाच्या कामाचे यश आहे. 

दोन-तीन वर्षांत टॅंकरची कमी झालेली संख्या पाहता जलयुक्त शिवार अभियान व लोकसहभागातील कामे यशस्वी झाल्याचे दिसून येते. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी जलसंधारणाची मोठ्या प्रमाणात कामे झाली. यावर्षी तालुक्‍यात चांगला पाऊस झाला तर पुढच्या वर्षी टॅंकरची संख्या आणखी घटण्याची शक्‍यता आहे.

स्वयंस्फूर्तीची जलचळवळ
माण तालुक्‍यात यापूर्वी डिसेंबर-जानेवारी महिन्यातच ग्रामस्थांतून टॅंकरची मागणी केली जात होती. अनेकदा टॅंकर सुरू करण्यासाठी जनता रस्त्यावर उतरायची. मात्र, आज हीच जनता पाणीटंचाई कायमची दूर करण्यासाठी हाती टिकाव, खोरे घेऊन जलक्रांतीत सहभागी झाल्याचे दिसून येते. ज्या भागातील गावांत जलसंधारणाच्या कामांत ग्रामस्थांनी सहभाग घेतला नाही, त्याच गावांना पाणीटंचाई भासताना दिसून येते. येणाऱ्या काळात ही गावेही स्वयंस्फूर्तीने जलचळवळीत सामील होऊन तालुक्‍यात जलक्रांती होईल, अशी स्थिती आहे.

माण तालुक्‍यात गेल्या दोन-तीन वर्षांत लोकसहभागातून जलसंधारणाची कामे झाली. बहुतांश गावांत विविध कामांच्या माध्यमातून पाणीसाठे तयार झाले आहेत. वरूणराजाने चांगली कृपादृष्टी दाखवली तर तालुक्‍यातील बहुतांश गावे पाणीदार होतील.
- दादासाहेब कांबळे, प्रांताधिकारी

प्रशासनाच्या सकारात्मक भूमिकेमुळे जलसंधारणाची कामे करण्यास स्फूर्ती मिळाली. बहुतांश गावांत लोकसहभागातून चांगली कामे झाली. त्याचा फायदा टॅंकरच्या घटलेल्या संख्येवरून दिसून येतो. अशीच काही वर्षे जलसंधारणाची कामे झाली तर संपूर्ण तालुका पाणीदार होईल.
- देवराज तरटे, सरपंच, दानवलेवाडी (ता. माण)

ग्रामस्थांना अधिकाऱ्यांची साथ
माण तालुक्‍यात गेल्या दोन-तीन वर्षांपासून बहुतांश गावांत जलयुक्त शिवार अभियानांतर्गत व पाणी फाउंडेशनच्या स्पर्धेच्या निमित्ताने ओढे-नाले, तलाव, बंधाऱ्यांचे खोलीकरण, रुंदीकरण व गाळ काढण्याची तसेच सीसीटी, डीप सीसीटीबरोबर नवीन सिमेंट बंधाऱ्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तत्कालीन तहसीलदार सुरेखा माने यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, जलदूतांनी गावोगावी बैठका घेऊन जलसंधारणाबाबत ग्रामस्थांत जनजागृती करून लोकसहभागातून कामे करण्यास प्रवृत्त केले होते. आपली गावे पाणीदार करण्यासाठी ग्रामस्थांनीही उत्सफूर्तपणे सहभाग घेऊन कामे केली. गेल्यावर्षी ज्या ठिकाणी चांगला पाऊस झाला, त्या ठिकाणच्या पाणीसाठ्यात दुपटीने वाढ झाल्याने संबंधित गावांचे टॅंकर बंद झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com