वाठारजवळ पुलावरून वाहने कोसळण्याचा धोका

रहिमतपूर ते वाठार रस्ता - अरुंद व संरक्षक कठडे नसलेल्या पुलाच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.
रहिमतपूर ते वाठार रस्ता - अरुंद व संरक्षक कठडे नसलेल्या पुलाच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष आहे.

अरुंद व संरक्षक कठडे नसल्याचा परिणाम; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
सातारा - रहिमतपूर ते वाठार (किरोली) रस्त्यादरम्यान वाठारजवळ पूल असून, हा अरुंद व त्याला संरक्षक कठडे नसल्याने या पुलावर आजवर छोटे- मोठे अनेक अपघात झाले आहेत. मात्र, पुलाचे रुंदीकरण, संरक्षक कठडे बांधण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. गंभीर अपघात झाल्यावर या विभागाला जाग येणार काय असा सवाल विचारला जात आहे.       

वाठार (किरोली) रस्त्यादरम्यान वाठारजवळ एका सार्वजनिक सिंचन योजनेचे पंपिंग हाऊस आहे. परिणामी तेथे कायम मोठा पाणीसाठा केला जातो. त्याचे  बॅकवॉटर रस्त्यापर्यंत येते. रस्त्यावर असलेल्या पुलाखालूनही पाणी वाहत असते. तेथे पाण्याची खोली साधारण ५० ते १०० फूट खोल असू शकते, असे तेथील ग्रामस्थांनी सांगितले. मात्र, या पुलाला कसलेही संरक्षक कठडे नाहीत. पूर्वी कधी तरी बांधलेले छोटे संरक्षक कठडे कुठेतरी वितभर तोंड  वर काढलेले दिसतात. त्यातच हा पूलही खूप अरुंद आहे. पुलाचा पायाही कमकुवत 

झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अशा स्थितीमध्ये या पुलावरून वारंवार छोटे- मोठे अपघात होत असतात. मात्र, त्याच्या नूतनीकरणाकडे किंवा दुरुस्तीकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. 

वाठार (किरोली) रस्त्यावरून रहिमतपूरकडून कऱ्हाडकडे जाणारी एसटी, खासगी मालवाहतूक, हंगामनिहाय उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात असते. दुचाकी वाहनांचीही वर्दळही कायम असते. पुलाजवळ आल्यावर पुलाच्या दोन्ही बाजूला पाण्याच्या बाजूने खोल उतार आहे. प्रत्यक्ष पुलावर व दोन्ही बाजूला कसलेच संरक्षक कठडे नाहीत. त्यातच पूल अरुंद असल्यामुळे एका वेळी दोन जड वाहनांना एकमेकाला पास करता येत नाही. एका वाहनाला दुसऱ्या बाजूला थांबल्याशिवाय वाहतूक सुरळीत होऊ शकत नाही. अशा वेळी दुचाकी वाहनांना ती वाहने पुढे जाईपर्यंत एका बाजूला थांबावे लागते. अशा वेळी अपघाताची शक्‍यता अधिक असते. पुलाच्या दोन्ही बाजूला खोल खड्डे आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी अनावधानाने तेथून खाली पाण्यामध्ये वाहने जाऊ शकतात. दुचाकी वाहनांसह बैलगाड्या या खोल पाण्यात पडल्याची माहितीही ग्रामस्थांनी दिली. पावसाळ्यामध्ये तर येथील स्थिती खूपच गंभीर बनते. गेली कित्येक वर्षे ही स्थिती कायम आहे. तेव्हा या पुलाची रुंदी वाढवावी, पुलावर व पुलाच्या दोन्ही बाजूला भरावांना संरक्षक कठडे उभारावेत, पुलाचा पाया भक्कम करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

वाठारजवळील या पुलाची रुंदी वाढवणे, पुलावर व पुलाच्या दोन्ही बाजूला संरक्षक कठडे उभारणे, पुलाचा पाया भक्कम करणे, तसेच किरोली येथील पुलाची दुरुस्ती असे प्रत्येकी सुमारे दहा लाख रुपयांचे दोन प्रस्ताव पूल दुरुस्तीअंतर्गत मंजुरीसाठी पाठवले आहेत. मंजुरी आल्यानंतर ही दुरुस्ती तातडीने करण्यात येईल.’’
- आर. व्ही. पात्रेकर, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, कोरेगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com