आघाडी नाही; नेत्यांचा सवतासुभा!

आघाडी नाही; नेत्यांचा सवतासुभा!

विधानसभेची समीकरणे नगरपालिका निवडणुकीत विस्कटल्याचा परिणाम

कऱ्हाड - विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या बेरजेच्या राजकारणातून जुळून आलेली राजकीय समीकरणे मध्यंतरी झालेल्या पालिका निवडणुकीत विस्कटली. त्याचा परिणाम जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत दिसून येतोय. पालिका निवडणुकीतील प्रचारादरम्यान झालेल्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या नेत्यांची मने आता येणाऱ्या निवडणुकीत जुळून येण्याची शक्‍यता मावळली असल्याने त्यांनी सवतासुभा केला आहे. त्यांच्यात पडलेल्या फुटीचा गावोगावच्या गटांवरही परिणाम दिसून येत आहे. 

वेगवेगळ्या निवडणुकीत प्रत्येक वेळी तालुक्‍यातील राजकारण बदलत असल्याचे दिसत आहे. प्रत्येक निवडणुकीला संदर्भ वेगळे असल्याने त्यामध्ये बदल दिसत आहेत. मध्यंतरी झालेल्या पालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. तत्पूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आमदार बाळासाहेब पाटील यांचे गट एकत्र आले होते. त्यामुळे अनेक गावांतील त्यांच्या विचारांचे कार्यकर्तेही एकत्र आले. दोन्ही गटांची ताकद वाढली होती. दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येवून काही गावांत सत्ताही स्थापन केली. मात्र, पालिकेच्या निवडणुकीत श्री. चव्हाण यांनी जनशक्ती आघाडीच्या माध्यमातून, तर आमदार पाटील यांनी लोकशाही आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली. त्यामुळे विधानसभेसाठी बेरजेच्या राजकारणातून जुळून आलेली राजकीय समीकरणे विस्कटली. नेत्यांचीही मने दुरावली आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत ही समीकरणे पुन्हा जुळून येतील, असे सध्या तरी चित्र नाही. नेत्यांमधील बिघडलेल्या संबंधांचा त्यांच्या गावोगावच्या गटांवरही परिणाम दिसून येत आहे. 
 

दोन्ही गटांची ताकद विभागली जाणार आहे. सध्या दोन्ही गटांतील इच्छुकांनी स्वतंत्ररित्या तयारी करून निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. दोन्ही नेत्यांची आघाडी होणार नाही, हे गृहित धरूनच संबंधित इच्छुकांनी प्रचार सुरू केला आहे. हे चित्र असेच राहिले तर जिल्हा परिषद व पंचायत समितीची सत्ता मिळवण्यासाठी नेत्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.  

उंडाळकर-भोसलेंचीही अडचण 
कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर आणि डॉ. सुरेश भोसले व भाजपचे चिटणीस अतुल भोसले यांचे गट एकत्र आले. त्यानंतर कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूकही दोन्ही गटांनी एकत्रित लढवली. तेथेही त्यांचा विजय झाला. त्यानंतर त्यांनी पालिका निवडणुकीत एकमेकांना साथ केली. मात्र, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही गट एकत्र राहतील, अशी चिन्हे आहेत. मात्र, भाजपने स्बळाचा नारा दिल्याने दोन्ही गटांची अडचण झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com