वादळात भिंत अंगावर पडून महिलेचा मृत्यू  

daund
daund

दौंड (पुणे) : गिरीम (ता. दौंड) येथे काल वादळामुळे भिंत अंगावर पडून लताबाई एकनाथ थोरात (वय 55) यांचा मृत्यू झाला असून तिघे जण गंभीर जखमी झाले आहे. दौंड शहरात वादळामुळे वृक्ष व झाडांच्या फांद्या वीजवाहिन्यांवर पडल्याने कालपासून वीजपुरवठा खंडित आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील राष्ट्रीयकृत व खासगी बॅंकांचे कामकाज विस्कळित झाले होते. 

गिरीम येथील थोरात वस्ती येथे सोमवारी (ता. २८) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळामुळे थोरात कुटुंबीय गोठ्याच्या भिंतीच्या आडोशाला थांबले होते. वादळाच्या वेगामुळे भिंत अंगावर पडल्याने लताबाई थोरात यांचा मृत्यू झाला. तर मोहिनी एकनाथ थोरात (वय १७ ), मंदा शांताराम जगताप (वय ३२), शांताराम शंकर जगताप (वय ४२, तिघे रा. गिरीम) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. महसूल खात्याने घटनास्थळी पंचनामा केला असून या प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.                    

दौंड शहरात वादळानंतर काल रात्री महादेव गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नवीन प्रशासकीय इमारत मार्ग, दीपमळा, जनता कॅालनी, समतानगर, भीमनगर, रेल्वे हायस्कूल प्रांगण, गोकुळ हॅाटेल रस्ता, पाटबंधारे वसाहत, डिफेन्स कॅालनी, मुख्य टपाल कार्यालय, महावितरण कार्यालय, आदी भागांत रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक विस्ळित होण्यासह चारचाकी व दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. महादेव मंदिरासमोरील वृक्ष निंबाळकर बिल्डिंगवर पडल्याने बिल्डिंगला तडे गेले असून लोखंडी अॅंगल वाकले असून झाडाखाली सापडल्याने राजेंद्र पगारिया व संजय पगारिया यांच्या वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. शहरात अनेक इमारतींवरील सोलर पॅनेल, घरावरील व घरासमोरील पत्रे वादळामुळे खाली पडले होते. महावितरणचे कर्मचारी  काल (ता. २८) रात्री पासून वीजवाहिन्यांवर झाडे आणि फांद्या तोडण्याचे काम करीत आहेत.  

दौंड ते पाटस दरम्यान बेटवाडी येथे एक झाड उन्मळून रस्त्याच्या मधोमध पडले होते तर बिरोबावाडी, वायरलेस फाटा, मांढरे मळा, गार फाटा, आदी ठिकाणी रस्त्यावर झाडांच्या फांद्या पडल्या होत्या. 

दौंड तहसील कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी (ता. २८) देऊळगाव राजे येथे ३६ , दौंड शहरात २३ व रावणगाव येथे १९ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद आहे. 

बोरीबेल येथे केळी बागांचे मोठे नुकसान...
बोरीबेल (ता. दौंड) येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नितीन नामदेव शेळके, संतोष पोपट जाधव, विक्रम कटारिया व इतर शेतकऱ्यंच्या केळीच्या बागा भुईसपाट झाल्याने मोठे नुकसान झाले. गोरख जगन्नाथ रसाळ यांचे पॅालीहाऊस व शेडनेटचे तर संतोष हरिदास पाचपुते यांचा गोठा व पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती दौंड बाजार समितीचे संचालक दत्तात्रेय पाचपुते यांनी दिली.       

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com