चौदा हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती

Student-Scholarship
Student-Scholarship

पुणे - इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत शहर व जिल्ह्यातील १ लाख ५३ हजार ६६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी ३० हजार ३५२ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये पाचवीच्या १६ हजार ५९३ तर, इयत्ता आठवीच्या १३ हजार ७५९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील १४ हजार ९६ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यामध्ये पाचवीचे आठ हजार १२४ आणि आठवीचे पाच हजार ९७२ विद्यार्थी असल्याचे प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनील कुऱ्हाडे यांनी मंगळवारी सांगितले.

कुऱ्हाडे म्हणाले, ‘‘महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने दरवर्षी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा ई, जे, के, एफ, जी, एच आणि आय या सात संच प्रकारांमध्ये घेण्यात येते. शिवाय तालुकास्तरीय ए, बी, सी आणि डी हे चार संच प्रकार वेगळे असतात.

जिल्हास्तरीय सात संच प्रकारात राष्ट्रीय ग्रामीण (ई), ग्रामीण सर्वसाधारण (जे), शहरी सर्वसाधारण (के), सर्वसाधारण मुले- मुली (एफ), सर्वसाधारण मुली (जी), मागासवर्गीय मुले- मुली (एच) आणि मागासवर्गीय मुली (आय) आदींचा समावेश आहे. तालुकास्तरीय संचामध्ये ग्रामीण सर्वसाधारण (ए), ग्रामीण अनुसूचित जाती (बी), ग्रामीण भूमिहीन शेतमजुराचा पाल्य (सी) आणि ग्रामीण आदिवासी (डी) आदी संचांचा समावेश आहे. शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना संचनिहाय दरमहा प्रत्येकी किमान ४० रुपये, तर कमाल दीडशे रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. पाचवीच्या विद्यार्थ्यांना तीन वर्षांसाठी, तर आठवीच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी या शिष्यवृत्तीचा लाभ मिळतो.’’

इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शहर व जिल्ह्यातील चार लाख ८८ हजार ८५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी चार लाख ७२ हजार ६१० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ५१ हजार २९३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. परीक्षा दिलेल्यांपैकी १ लाख ८ हजार ५६० जण उत्तीर्ण झाले. त्यापैकी १६ हजार ५९३ शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरल्याचे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी ज्योती परिहार यांनी सांगितले. 

आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तीन लाख ७० हजार २४३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात तीन लाख ५८ हजार ८४८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील ३० हजार २३८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ४५ हजार १०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी १३ हजार ७५९ जण शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.

राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती ६८० जणांना
पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी ६८० जणांची निवड राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्तीसाठी झाली आहे. यामध्ये दोन्ही वर्गांतील प्रत्येकी ३४० विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचे प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सुनील कुऱ्हाडे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com