ग्रामविकास मंत्र्यांच्या परळीत शिक्षकांचा 'आक्रोश'

aakrosh-morcha
aakrosh-morcha

सोमेश्वरनगर (पुणे) : राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांनी नव्या बदली धोरणाविरोधात आता ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना परळीत जाऊन आव्हान देण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ या बड्या संघटनेच्या वतीने हजारोंच्या संख्येने शिक्षक २९ एप्रिल रोजी गोपीनाथगड ते परळी असा पायी 'आक्रोश मोर्चा' काढणार आहेत. 

पुणे येथील शरदचंद्रजी पवार शैक्षणिक संकुलात महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाची राज्यस्तरीय महामंडळ नुकतीच संपन्न झाली. सभेमध्ये ग्रामविकास विभागाने 27 फेब्रुवारी 2017 च्या धोरणानुसार सुरू केलेल्या बदल्यांना तीव्र विरोध करण्याचा ठराव करण्यात आला. शिक्षक नेते संभाजीराव थोरात सभेच्या अध्यक्षस्थानी होते.

राज्यभरातून शिक्षक संघाचे राज्य पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. मागील वर्षीही शिक्षक संघटनांनी बदल्यांना तीव्र विरोध करत धरणे धरले, न्यायालयाचेही दरवाजे ठोठावले. या वादात बदल्या रेंगाळल्या आणि दिवाळीनंतर बदल्या स्थगित करण्यात आल्या. यावेळी मात्र प्रशासनाने मार्चमध्येच प्रक्रिया सुरू केल्याने नव्या शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी बदल्यांचे आदेश हातात दिले जातील अशी अटकळ बांधली जात आहे. बदलीपात्र शिक्षकांच्या याद्याही जाहीर करण्यात आल्या आहेत. या प्रक्रियेत शिक्षक संघटना शांत होत्या. त्यामुळे बदल्या निश्चित असेच मानले जात होते. परंतु आता नव्याने शिक्षक संघटनांनी उचल खाल्ली असून थेट पंकजा मुंडे यांनाच आव्हान दिले आहे. पंकजा मुंडे ग्रामविकास मंत्री असून त्यांनी संघटनाना बदलीधोरणातील जाचक अटी काढण्याचा शब्द दिला होता. तो पाळला नसल्याची शिक्षकांची भावना आहे. ग्रामविकास सचिव असीम गुप्ताही आपल्या भुमीकेवर ठाम आहेत. त्यामुळे शिक्षकांनी ग्रामविकास खाते टार्गेट करण्याचे ठरविलेले दिसते.

शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे म्हणाले, या पध्दतीमुळे सुमारे दोन लाख शिक्षकांच्या प्रशासकिय बदल्या गैरसोयीच्या ठिकाणी होण्याची शक्यता असल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी चुकीची संचमान्यता झाली आहे. अनेक शाळांमध्ये विनाकारण शिक्षक अतिरीक्त दाखविले आहेत. बदलीस पात्र नसूनही यादीमध्ये शिक्षकांची नावे आली आहेत. संवर्ग एक, दोन व तीन यांच्या बदलीने रिक्त झालेल्या जागा संवर्ग चारमधील कर्मचाऱ्यांना दाखविणे गरजेचे आहे. परंतु संवर्ग चारला सर्वच जागा दाखविल्या जात असल्याने गोंधळ उडाला आहे. ग्रामविकास विभागाने बदली आदेशात यावर्षी दुरूस्त्या करून बदल्या करणे अपेक्षित होते. बदल्यांना विरोध नाही पण धोरण दुरूस्त केल्याशिवाय थांबणार नाही.  

गोपीनाथगड ते परळी 
राज्य शिक्षक संघाचे तीन लाख सभासद आहेत. आक्रोश मोर्चास एक लाख शिक्षक येतील असे नियोजन केले आहे. गोपीनाथगडावरुन हा आक्रोश मोर्चा सुरू होईल आणि परळीत संपेल. परळीत मोठी सभा पार पडेल, अशी माहिती मारणे व खंडेराव ढोबळे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com