भामा आसखेड धरणातून आळंदीच्या योजनेला मंजुरी

भामा आसखेड धरणातून आळंदीच्या योजनेला मंजुरी

आळंदी - ‘‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाअंतर्गत आळंदीसाठी २७ कोटींची योजना प्रस्तावित आहे. त्याअंतर्गत थेट भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. या योजनेबाबत पालिकेने सादर केलेल्या प्रस्तावास नगरविकास खात्याची लवकरच मंजुरी देऊ,’’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता. १०) मुंबईला आळंदीतून गेलेल्या नगरसेवकांच्या शिष्टमंडळाला दिले. याबाबत अधिक माहिती देताना नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर आणि उपनगराध्यक्ष सागर भोसले यांनी सांगितले की, आळंदीची वाढतील लोकसंख्या पाहता, सध्याची जलशुद्धीकरण यंत्रणा कमी पडत आहे. दरम्यान, पिंपरी महापालिका तसेच अन्य छोट्या मोठ्या ग्रामपंचायतींमार्फत हजारो लिटरचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच थेट इंद्रायणीत सोडले जात आहे. यामुळे आळंदीकरांना अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. आळंदीकर आणि भाविकांना शुद्ध पाणी पिण्यासाठी मिळावे यासाठी आळंदी पालिकेने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत शासनाला साडे सत्ताविस कोटींची थेट भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केला आहे. मात्र मंजुरीस विलंब झाला. यामुळे नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर, उपनगराध्यक्ष सागर भोसले आणि नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत सह्याद्री येथे भेट घेतली.

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आळंदीकर आणि वारकऱ्यांना निवडणुकीत दिलेले आश्वासन मी पाळणार आहे. भामा आसखेडमधून पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेस लवकरच मंजुरी दिली जाईल, असे आश्वासन या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. पालिका इमारतीच्या बांधकामासाठी पंधरा कोटींच्या निधीची मागणीही या वेळी निवेदनाद्वारे करण्यात आली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com