अर्ज अप्रूव्ह करून घ्यावाच लागणार ; सीबीएसईसह अन्य बोर्डांच्या विद्यार्थ्यांसाठी निर्णय

The application must be approved Decisions for students of other boards with CBSE
The application must be approved Decisions for students of other boards with CBSE

पुणे : अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेत सहभागी होणाऱ्या राज्य शिक्षण मंडळाव्यतिरिक्त सीबीएसईसह अन्य सर्व मंडळांच्या विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग एक मान्य (अप्रूव्ह) करून घ्यावा लागणार आहे. त्यासाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात नऊ मार्गदर्शन केंद्रे सोमवारपासून सुरू होणार आहेत. 

अन्य बोर्डांच्या दहावीच्या परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यांना पुण्यात वा पिंपरी-चिंचवडमधील कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल, तर ऑनलाइन प्रक्रियेत सहभागी व्हावे लागेल. त्यासाठी माहिती पुस्तिका आणि लॉग इन आयडी विकत घेणे बंधनकारक आहे. ते नऊ मार्गदर्शन केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी लॉग इन वापरून अर्जाचा भाग एक भरायचा आहे. 

सर्व विद्यार्थ्यांना अर्ज भरल्यानंतर तो मार्गदर्शन केंद्राकडून मान्य करून घ्यावा लागेल. म्हणजेच विद्यार्थ्याचे गुण, त्याच्याकडील आरक्षणासंबंधीची कागदपत्रे तपासली जातील त्यानंतरच संबंधित अधिकारी त्या अर्जास मान्यता देईल. 

ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग दोन भरता येणार नाही, तसेच अर्ज सबमिटदेखील होणार नाही. अर्ज अप्रूव्ह करून घेण्यासाठी गुणपत्रिका, आरक्षणासंबंधी सर्व कागदपत्रे घेऊन जावीत. केंद्रांवर ती तपासली जाणार आहेत. खुल्या गटातील विद्यार्थ्यांनादेखील त्यांचा अर्ज मान्य करून घेणे सक्तीचे आहे. ही सक्ती राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी लागू नाही. 

शून्य फेरीतील प्रवेश 

- संस्थांतर्गत (इनहाऊस), व्यवस्थापन आणि अल्पसंख्यक कोट्यातील प्रवेश 
- सर्व महाविद्यालयांतील विज्ञान आणि वाणिज्यचे द्विलक्ष्यी अभ्यासक्रमाचे प्रवेश 
- तांत्रिक अकरावीच्या (एमसीव्हीसी) तांत्रिक कोट्यातील 25 टक्के प्रवेश 

फेऱ्यांची संख्या 

नियमित चार फेऱ्या होतील. त्यानंतर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश म्हणजे "एफसीएफएस' फेरी होईल. पुढे दहावीच्या फेरपरीक्षेच्या निकालानंतर पुन्हा नियमित दोन फेऱ्या होतील. नंतर गरजेनुसार "एफसीएफएस' फेऱ्या होतील. या किमान दोन फेऱ्या असतील; परंतु त्यांची संख्या वाढविली जाऊ शकते. 

अर्ज भरण्याची मुदत 

राज्य बोर्डाचा ऑनलाइन निकाल लागल्यानंतर ऑनलाइन अर्जाचा भाग एक आणि दोन भरण्यासाठी मुदत राहील. अकरावी प्रवेशासाठी आतापर्यंत 61 हजार 498 विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग एक भरला आहे. 

या वर्षीच्या जागा ः 94 हजार 
आतापर्यंत भरलेले अर्ज ः 61 हजार 498 

गेल्या वर्षीच्या जागा ः 92 हजार 
झालेले प्रवेश ः 72 हजार 

मार्गदर्शन केंद्र (अन्य बोर्डासाठी) 
आरसीएम गुजराती कनिष्ठ महाविद्यालय (फडके हौद), श्‍यामराव कलमाडी (एरंडवणे), राजीव गांधी ई-लर्निंग (सहकारनगर), सिंहगड (आंबेगाव बुद्रुक), सेंट मिराज (कोरेगाव पार्क), आबेदा इनामदार (आझम कॅंपस), सेंट पॅट्रिक्‍स (एम्प्रेस गार्डन), सिंबायोसिस (सेनापती बापट रस्ता), भारतीय जैन संघटना (संत तुकारामनगर, पिंपरी), एसएनबीपी (रहाटणी, पिंपरी), प्रेरणा विद्यालय (निगडी प्राधिकरण). 

विद्यार्थ्यांनी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचून प्रवेश अर्ज भरावेत. सायबर कॅफेमध्ये अर्ज भरू नयेत. राज्य बोर्डाच्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज त्यांच्या दहावीच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी भरून घ्यायचे आहेत. अन्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अर्जाचा भाग एक अप्रूव्ह करून घेतला पाहिजे. 
- दिनकर टेमकर, शिक्षण उपसंचालक 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com