पुणे - सनदी लेखपाल (सीए)च्या अंतिम परीक्षेत जयपूर येथील अतुल अगरवाल आणि सुरत येथील प्रीत शहा हे देशात प्रथम आले आहेत. "इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया'ने (आयसीएआय) या परीक्षा सुधारित आणि सध्याचा अभ्यासक्रम अशा दोन्ही पद्धतीने मे महिन्यात घेतल्या होत्या.
सध्याच्या अभ्यासक्रमाची परीक्षा देशभरातून एक लाख तीन हजार 773 विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यातील नऊ हजार 104 विद्यार्थी सनदी लेखापाल म्हणून पात्र ठरले आहेत. सुधारित अभ्यासक्रमाची परीक्षा चार हजार 33 जणांनी दिली होती. त्यातील 139 जण पात्र झाले आहेत.
ैअहमदाबाद येथील आगम दलाल याने देशात दुसरा आणि सुरत येथील अनुराग बगारिया याने तिसरा क्रमांक मिळविला. दोघांनीही सध्याच्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा दिली होती. तसेच सुधारित अभ्यासक्रमाच्या परीक्षेत बंगळूर येथील अभिषेक नागराज द्वितीय आणि उल्हासनगर येथील समीक्षा अगरवालने तृतीय क्रमांक मिळविला आहे.
निकालाचे विश्लेषण करताना "आयसीएआय'च्या पुणे शाखेचे अध्यक्ष आनंद जाखोटिया म्हणाले, ""सनदी लेखापाल परीक्षेचा निकाल नेहमी कमी लागतो. त्यामागे गुणवत्ता राखण्याचा प्रयत्न असतो. हा निकालही तसाच आहे. त्यात फार वाढ झालेली नाही. या वर्षीपासून अभ्यासक्रमही बदललेला आहे.''
'औद्योगिक क्षेत्राच्या गरजेनुसार अभ्यासक्रमात बदल करण्यात आलेले आहेत. त्यानुसार पहिली परीक्षा मे महिन्यात झाली होती. पूर्वी कॉमन प्रोफेसिएन्सी टेस्ट (सीपीटी) होती. आता ती जाऊन पुन्हा फाउंडेशन पद्धत आणली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाचा पाया भक्कम होऊन पुढील परीक्षांमध्ये त्याचा फायदा होईल. तसेच नव्या अभ्यासक्रमामुळे पात्र सनदी लेखापालांना जागतिक स्तरावर मान्यता मिळेल,'' असे त्यांनी सांगितले.
जुन्या अभ्यासक्रमानुसार नोव्हेंबर 2019 पर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा देता येईल. नंतर मात्र नव्या अभ्यासक्रमानुसारच परीक्षा द्यावी लागेल. नव्या अभ्यासक्रमाला आता विद्यार्थी कमी दिसत असले, तरी पुढे ही संख्या वाढत राहील.
- राजेश पाटील, सीए
|