पुणे - 'मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था जगात सातव्या क्रमांकावर आली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्राने बहुतांश बाबतीत सवलती घोषित केल्या आहेत. पण काळा पैसा शोधून काढणे हे जिकीरीचे असून, प्रत्यक्षात गुणात्मक प्रगतीही आवश्यक आहे,'' असे मत चार्टर्ड अकाउंटंट डॉ. दिलीप सातभाई यांनी अर्थसंकल्पावरील विश्लेषणाबाबत व्यक्त केले.
पुणे नगर वाचन मंदिर आयोजित कार्यक्रमात, "अर्थसंकल्प 2017 ः कर रचनेतील बदल' या विषयावर ते बोलत होते. या वेळी माधव सोमण, सुवर्णा जोगळेकर उपस्थित होते. प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष कर, कर रचनेतील बदल, प्राप्तिकर विभागाला दिलेले अधिकार, घरबांधणी आदी विषयांवर सातभाई यांनी विचार व्यक्त केले.
ते म्हणाले, 'जगात अमेरिकेची अर्थव्यवस्था पहिल्या क्रमांकावर आहे. तर चीनची अर्थव्यवस्था दुसऱ्या क्रमांकावर आहे. आशिया खंडात भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची आहे. मोदी सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत; पण प्राप्तिकर विभागाला दिलेल्या अधिकारामुळे भविष्यात काही समस्याही उद्भवू शकतात. घरबांधणीचा उपक्रम स्तुत्य आहे. पण महाराष्ट्र, कर्नाटकातील घराच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्याचाही विचार केंद्राने करायला हवाय.''
लक्ष्मी रस्ता - "अर्थसंकल्प 2017 - कररचनेतील बदल' या विषयावर विचार व्यक्त करताना डॉ. दिलीप सातभाई.
|