‘बीआरटीतील अपघाताला सत्ताधारी जबाबदार’

‘बीआरटीतील अपघाताला सत्ताधारी जबाबदार’

वडगाव शेरी - विकासकामाचे श्रेय घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी ‘सेफ्टी ऑडिट’ न करता बीआरटी सुरू केली. या असुरक्षित बीआरटी मार्गामध्ये दहा महिन्यांमध्ये तीसपेक्षा अधिक अपघात झाले आहेत. या सर्व अपघाताला सत्ताधारी जबाबदार असल्याचे मत प्रभाग ३ मधील भाजपचे उमेदवार मुक्ता अर्जुन जगताप यांनी व्यक्त केले.

 विमाननगर-लोहगाव प्रभाग तीनमधील भाजपचे उमेदवार जगताप, राहुल भंडारे, श्वेता खोसे -गलांडे, ज्येष्ठ नगरसेवक बापूराव कर्णे गुरुजी यांनी गांधीनगरमध्ये मतदारांशी संवाद साधला. या वेळी जगताप बोलत होते. 

जगताप म्हणाल्या, ‘‘करोडो रुपये खर्च करून बीआरटी तयार केली. मात्र, या बीआरटीचा मार्ग चुकला आहे. कोठे जास्त, तर कुठे कमी मार्ग आहे. या मार्गामध्ये प्रवाशाच्या सुरक्षितेचे कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. बीआरटीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. बीआरटीमधील अपघात ही नित्याची बाब झाली आहे. सत्ताधाऱ्यांनी नागरिकांच्या जिवाशी खेळ केला आहे.’’

बापूराव कर्णे गुरुजी आणि राहुल भंडारे म्हणाले, ‘‘सत्ताधारी म्हणजे बोलाचा भात, बोलाची कढी. बीआरटीमध्ये अपघात रोखण्यासाठी रामवाडीत, विमाननगर, येथे उड्डाण पूल करणार, अशी घोषणा करून सहा महिने झाले तरी, अद्याप काहीच काम केले नाही. आत्ता निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा उड्डाण पुलाची घोषणा करून नागरिकांची दिशाभूल करत आहेत. बीआरटी मार्गात सुरक्षिततेच्या विविध उपाययोजना करणार, असे सत्ताधाऱ्यांनी जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी हात झटकले.’’

श्वेता खोसे-गलांडे म्हणाल्या,‘‘ विमाननगरमध्ये वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. ही समस्या सोडविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्याचे नियोजन आम्ही केले आहे. फक्त सांगणार नाही, तर काम करून दाखवणार.’’

अखिल संजय पार्क युवा मंचच्या वतीने विमाननगर-लोहगाव प्रभाग तीनच्या भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. या वेळी अर्जुन ढवळे, अजिपा सय्यद, आतिफ सय्यद, अश्रफ सय्यद आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

काळेबोराटेनगर परिसरात राष्ट्रवादीची पदयात्रा
हडपसर - ‘प्रभाग क्रमांक २३’ च्या विकासासाठी राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांना निवडून द्या,’ असे आवाहन करीत काळेबोराटेनगर येथे राष्ट्रवादीतर्फे पदयात्रा काढण्यात आली. विकासकामांचा अजेंडा घेऊन रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची पत्रके घरोघरी वाटण्यात आली. महिला मंडळे, बचतगट, तरुण मंडळाचे कार्यकर्ते या प्रचार फेरीत सहभागी झाले होते. 

प्रभाग २३ मधून राष्ट्रवादी पक्षाकडून नगरसेविका व माजी महापौर वैशाली बनकर, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, सावली फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश ससाणे आणि शहीद भगतसिंग ट्रस्टचे अध्यक्ष विजय मोरे हे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

या प्रभागात राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेविका बनकर यांच्या प्रयत्नातून तुकाई टेकडीवर ४० लाख लिटरची पाण्याची नवीन टाकी बांधल्याने काळेबोराटनेगर भागातील पाणी प्रश्न मार्गी लागला आहे. माजी महापौर राजलक्ष्मी भोसले यांनी काळेबोराटेनगर भागात केलेल्या विविध विकासकामांमुळे या भागाचा चेहरामोहरा बदलला आहे. त्यांच्या दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक महिला स्वावलंबी झाल्या आहेत. सावली फाउंडेशनच्या माध्यमातून योगेश ससाणे यांनी सुमारे १६ हजार महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण, संगणक, कराटे, शिलाई प्रशिक्षण, महिलांना चारचाकी ड्रायव्हिंग प्रशिक्षक, व्यक्तिमत्त्व विकास, स्पोकन इंग्लिश कोर्सचे प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर झाल्या आहेत. विजय मोरे हे शहीद भगतसिंग प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा केंद्र, तरुणांना पोलिस भरती मार्गदर्शन, मोफत शववाहिका, भव्य रक्तदान शिबिर या माध्यमातून गेली अनेक वर्षे सामाजिक कार्य करत  आहेत.

काळेबोराटेनगरमधील पाणी प्रश्न, मोकाट डुकरांचा प्रश्न, ससाणेनगर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी मंत्री मार्केट ते काळेपडळ रस्ता तयार करणे, तसेच काळेबोराटनेगर मधील आरक्षित जागांवर हायस्कूल, रुग्णालय, क्रीडांगणाची निर्मिती करण्यासाठी पुढील काळात प्रयत्न करण्यात येणार असल्याचे आश्‍वासन चारही उमेदवारांनी नागरिकांना दिले. 

खराडी कचरामुक्त करण्याचा संकल्प
वडगाव शेरी - खराडीमध्ये गेल्या काही वर्षांतील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता येथे तयार होणारा कचरा हा अत्याधुनिक पद्धतीने प्रभागातच जिरविण्याचे नियोजन आहे. त्यामुळे भविष्यात खराडी शंभर टक्के कचरामुक्त करू, असे आश्‍वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार महेंद्र पठारे यांनी दिले. 

खराडी परिसरात मोठ्या प्रमाणावर हाउंसिंग सोसायट्या असून, येथील कचऱ्याचे येथेच वर्गीकरण करून जिरवणे व त्यामुळे शहरातील एकूण कचऱ्याची समस्या कमी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी सांगितले.

खराडीतील राष्ट्रवादीचे प्रभाग चारचे उमेदवार महेंद्र पठारे, संजीला पठारे, सुमन पठारे, ॲड. भैयासाहेब जाधव या उमेदवारांनी राजाराम पाटील नगर येथे पदयात्रा काढून घरोघरी नागरिकांशी संवाद साधला. या वेळी विघ्नहर्ता मित्र मंडळ, शंभूराजे प्रतिष्ठान, अखिल राजाराम पाटील मित्र मंडळ यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. ख्रिश्‍चन समाजानेही प्रतिसाद देऊन राष्ट्रवादीच्या पाठीमागे उभे राहणार असल्याचे आश्वासन दिले. या वेळी पप्पूशेठ गरुड, महादेव पठारे, विठ्ठल भुजबळ, रमेश पठारे, बबन तात्या पठारे, मधुकर पठारे, विनोद पठारे, दत्ता म्हस्के, संदीप दरेकर, अनिकेत झेंडे, चिराग टोपे, आदित्य झेंडे, मयूर झेंडे, सचिन म्हेत्रे, कैलास भुजबळ, पांडुरंग पठारे आदी उपस्थित होते. 

समांतर यंत्रणा प्रभावी
या प्रभागाच्या प्रचाराचे नियोजन माजी आमदार बापू पठारे आणि ज्येष्ठ नेते अण्णासाहेब पठारे यांच्या अनुभवी मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पक्षाच्या प्रचार यंत्रणेसोबत आणि दोघांच्या सूचना यामुळे समांतर यंत्रणा प्रभावी ठरत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रचाराला गती मिळाली असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.

‘शिवसेना प्रभाग २२ स्मार्ट बनविणार’
मुंढवा - ‘‘शिवसेनेला साथ द्या, महापालिकेत शिवसेनेची सत्ता आल्यानंतर प्रभाग क्रमांक २२ मुंढवा-मगरपट्टासिटी परिसरात मूलभूत समस्या सोडवून प्रभाग स्मार्ट बनवू. प्रभागाच्या उत्तुंग विकासासाठी शिवसेना उमेदवारांच्या पाठीशी उभे राहा. प्रभागात २४ तास पाणी पुरवठ्याचे नियोजन करू,’’ असा विश्‍वास मुंढवा-मगरपट्टा प्रभाग २२चे उमेदवार सुनील ऊर्फ अप्पा गायकवाड यांनी दिले. 

आप्पा गायकवाड, समीर (अण्णा) तुपे, गीतांजली आरू, सुवर्णा सतीश जगताप यांनी १५ नंबर, आकाशवाणी, एकता कॉलनी, विठ्ठलनगर, उत्कर्षनगर, सातव प्लॉट, चैतन्य सोसायटी, साधना सोसायटी, बनकर कॉलनी परिसरात पदयात्रा काढून मतदारांशी संवाद साधला. या वेळी औक्षण करून निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेल्या शिवसेनेच्या उमेदवारांचे जयघोषात स्वागत करण्यात आले. 

या प्रसंगी शाखाप्रमुख शिवाजीराव अहिरे, उपशाखाप्रमुख बाळासाहेब शिंदे, शिरीश राऊत, नीलेश आरू, सचिन आरू, ओमकार कांबळे, मामा भंडारी, सचिन तुपे, स्वप्नील तुपे, श्‍यामराव पाटील, इंद्रजित तुपे, प्रसाद तुपे, युवराज गायकवाड, गजानन बुर्डे, शिवाजी गायकवाड, शशिकांत पासलकर, रमजान खान, अक्षय पायगुडे, अलंकार तुपे, पुरुषोत्तम काळे, मनोज काटे, अविनाश गायकवाड, संकेत जगताप, राकेश गायकवाड आदी कार्यकर्ते व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. 

‘पाच वर्षांपूर्वी निवडणुकीत काहींनी अनेक आश्‍वासने दिली होती. आश्‍वासनांना भुलून जनतेने त्यांना मतदान केले. मात्र, सत्ता मिळताच त्यांना आश्‍वासनांचा विसर पडला. या वेळी मतदार मात्र या आश्‍वासनांना भुलणार नाहीत. या प्रभागात विकासकामे झालीच नाहीत. मुंढव्यात कोठेही उद्याने नाहीत, क्रीडासंकुले नाहीत. ही कामे शिवसेना करील, असेही गायकवाड व पॅनेलमधील इतर उमेदवारांनी मतदारांशी संवाद साधताना सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com