पिंपरी - 'राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि नेत्यांवरील भारती चव्हाण यांचे बेछूट आरोप हे हास्यास्पद आणि बिनबुडाचे आहेत. ते विकृत मानसिकतेमधूनच केले आहेत. पक्षात अन्याय होत होता, तर आजपर्यंत पक्षात का राहिलात ? दादागिरी आजच दिसली का ? स्वार्थासाठी इतर पक्षाची वाट धरताना जरा स्वतःबद्दलही आत्मपरीक्षण करावे'', असा सल्ला महापौर शकुंतला धराडे यांनी चव्हाण यांना दिला.
राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस आघाडीच्या राष्ट्रीय सरचिटणीस भारती चव्हाण यांनी ""पिंपरी-चिंचवड महापालिकेत दलालांचा बाजार भरला असून शहराऐवजी केवळ नेत्यांचा विकास झाला आहे. दादा, आता तरी दादागिरी थांबवा,''अशा शब्दांत अजित पवार यांच्यावर तोफ डागली होती. त्याला धराडे यांनी शुक्रवारी जोरदार प्रत्युत्तर दिले.
धराडे म्हणाल्या, 'अनेक वर्षे पक्षात राहून पक्षाच्या जिवावर मोठ्या झालेल्या आणि स्वकर्माने सध्या भारती चव्हाण या राजकीय विजनवासात गेल्या आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि नेते अजित पवार यांनीच भारती चव्हाण यांना राजकारणात आणले. त्यांना मानसन्मान देऊन विविध पदे दिली. जनसामान्यांमध्ये अजिबात स्थान नसतानाही पक्षाची कार्यकर्ती म्हणून त्यांचा नेहमीच सन्मान ठेवण्यात आला. परंतु, पालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांचा स्वार्थ उफाळून आलेला दिसतो. इतर पक्षांतील काही नेते त्यांचा वापर करत आहेत. हे त्यांचे दुर्दैव म्हणावे लागेल. त्यांचा बोलविता धनी वेगळाच होता. हे न समजण्याएवढी येथील जनता दुधखुळी नक्कीच नाही. ज्या पक्षाने सर्वात जास्त महिलांना न्याय दिला, त्याच पक्षाच्या नेत्यांवर महिलांना संधी मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. पाच वर्षांत महापालिकेत पक्षाने किती महिलांना संधी दिली याचा चव्हाण यांनी नीट अभ्यास करावा. महापौर, स्थायी समिती, महिला बाल-कल्याण, पक्षनेता, प्रभाग अध्यक्ष ही पदे महिलांनाच अधिक मिळाली आहेत.''
मग यादीच जाहीर करा !
बोलविता धन्याच्या पक्षाच्या ताब्यात ज्या महापालिका आहेत. त्याठिकाणी महिलांना किती स्थान आहे. याची यादीच तुम्हीच जाहीर करा, असे आव्हानही धराडे यांनी चव्हाण यांना दिले. पक्षातील नेत्यांनी तुमचा पराभव केला होता. तर मग, इतकी वर्षे तुम्ही गप्प का होता ? या कालावधीत तुम्ही कोमात होता काय ? असा तिखट सवालही धराडे यांनी केला.
|