लोकशाही टिकविण्याचे श्रेय काँग्रेसला: नाना पाटेकर

Nana Patekar
Nana Patekar

पुणे : "देशावर साठ वर्षे सत्ता केलेल्या काँग्रेसने काहीच केले नाही असे म्हणू नका. इतकी वर्षे देशात लोकशाही टिकली हे श्रेय काँग्रेसचेच आहे,'' असे म्हणत नाना पाटेकर यांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्या वर्धापनदिनीच टोला लगावला. 

काँग्रेसमुक्त भारत, साठ वर्षांमध्ये काँग्रेस सरकारने काय केले, असे प्रश्‍न उपस्थित केले जात आहेत. धर्मादाय आयुक्तांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचा सामुदायिक विवाह उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. त्यात नाम फाउंडेशन सहभागी होणार आहे. त्या बाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना नाना म्हणाले, ""गेली साठ वर्षे देशात लोकशाही टिकविण्याचे श्रेय कॉंग्रेसला दिले पाहिजे. आपल्या शेजारच्या देशांची काय अवस्था आहे, हे आपण पाहत आहोत.'' 

राजकारणातील मराठी नेतृत्वाबद्दल बोलताना ते म्हणाले, ""देवेगौडा पंतप्रधान झाले, पण शरद पवार झाले नाहीत. ते राज्यात मुख्यमंत्री झाले. केंद्रात कृषिमंत्री झाले. एक मराठी माणूस पंतप्रधान व्हावा, असे आपल्याला वाटतेच की.'' 

"डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे यांचे कार्य मोठे होते म्हणून त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान दिला. खेळातून आणि अभिनयातून पैसे कमविणाऱ्या खेळाडू, नटांना हा सन्मान का दिला जातो? आम्ही चित्रपटात काम करतो, पण त्यासाठी पैसे घेतो. ही सेवा नाही. त्यामुळे आम्हाला पद्मश्री सन्मान कशाला,'' असा सवालही पाटेकरांनी उपस्थित केला. 

"कायद्यासमोर सर्व समान आहेत,'' असे अभिनेता सलमान खान याला झालेल्या शिक्षेबद्दल त्यांनी सांगितले. 

हमीभाव निवडणुकीचे ट्रमकार्ड नव्हे 
हमीभाव म्हणजे निवडणुकीचे आमिष नाही. हमीभाव हे निवडणुकीत वापरण्याचे ट्रमकार्ड नाही. तो शेतकऱ्यांचा निर्विवाद हक्क आहे. शेतकऱ्यांची हमीभावाची मागणी निश्‍चितच रास्त आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग मिळायला हवा तसाच शेतकऱ्यांनाही त्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे. भविष्यात शेती हा रोजगार देणारा व्यवसाय असेल. 

शेतकऱ्यांच्या मुला-मुलींचा सामुदायिक विवाह 
धर्मादाय आयुक्तांच्या पुढाकाराने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या सामुदायिक विवाह सोहळ्यात नाम फाउंडेशन प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत करून सहभागी होईल, अशी माहिती अभिनेते मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांनी शुक्रवारी दिली. ते म्हणाले, ""हे सर्व धर्मीय विवाह सोहळे असतील आणि यात राज्यातील देवस्थानांचा निधी असेल. यात "बीसीसीआय'सारखी संस्थाही सहभागी होत आहे.'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com