पुणे - सध्या होणारा विकास हा चुकीचा आणि अनियोजित पद्धतीने होत असल्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. हवामानात मोठे बदल होत आहेत. या बदलांचा आपल्या जीवनावरही परिणाम होत आहे. त्याला विकास म्हणता येणार नाही. अनियोजित विकासाच्या राक्षसाशी लढण्याचा शाश्वत उपाय हाच सर्वोत्तम मार्ग आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी व्यक्त केले.
शाश्वतता क्षेत्रातील कार्याबद्दल संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी तोयम टेक्नॉलॉजीजचा भाग असलेल्या तोयम फाउंडेशनतर्फे हजारे यांच्या हस्ते वार्षिक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले, त्या वेळी हजारे हे "शाश्वत ग्रामविकास मॉडेल' या विषयावर बोलत होते.
बॅंकिंग क्षेत्रातील योगदानाबद्दल सर्व हरियाना ग्रामीण बॅंकेचे अध्यक्ष एम. पी. सिंग, कॉर्पोरेट गटात होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया या कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष हरभजन सिंग, स्वयंसेवी संस्था गटात बायफचे समूह उपाध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी यांना हजारे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष सूर्य वणू दलाल, कुमार प्रिय रंजन आणि नाबार्डचे एम. व्ही. अशोक उपस्थित होते.
हजारे म्हणाले, ""लोकांनी पुढे येऊन राष्ट्रनिर्माणात सक्रिय व सकारात्मक सहभाग घ्यावा, असे आवाहन मी करतो. शाश्वत उपाय शोधण्याचा समाजावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. समाजाला योगदान देताना निःस्वार्थ भाव हवा. लोकांनी स्वतःच्या भौतिकवादी जगातून बाहेर पडून जमेल त्या मार्गाने राष्ट्रासाठी वेळ द्यायला हवा.''
फाउंडेशनचे अध्यक्ष दलाल म्हणाले, ""या पुरस्कारांमुळे अन्य संस्थांना अधिक मोठे मापदंड प्रस्थापित करण्याची आणि समाज व राष्ट्रासाठी अर्थपूर्ण योगदान देण्याची प्रेरणा मिळेल, अशी मला आशा आहे.''
|