पाच राज्यांत पथदर्शी प्रकल्प सुरू, महाराष्ट्रात सर्वत्र कार्यान्वित
पुणे - झपाट्याने वाढणाऱ्या क्षयरोगाला रोखण्यासाठी राज्यात आता "डेली रेजिम' ही योजना सुरू आहे. क्षयरुग्णाला रोजच्या रोज नियोजित वेळेत औषध मिळणार असून, त्याचा थेट परिणाम या रोगाचा संसर्ग कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने "डेली रेजिम' ही क्षयरुग्णांपर्यंत औषध पोचविण्याची नवीन योजना सुरू केली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील पाच राज्यांचा त्यात समावेश असून, यात महाराष्ट्रासह सिक्कीम, हिमाचल प्रदेश, बिहार आणि केरळ ही राज्ये आहेत. या बाबत आरोग्य खात्याचे सहसंचालक (क्षयरोग) डॉ. संजीव कांबळे म्हणाले, ""गेल्या काही दिवसांपासूनच "डेली रेजिम' योजना सुरू आहे. यापूर्वीच्या क्षयरोग उपचारात औषधांच्या गोळ्यांची संख्या जास्त होती. या पद्धतीत चार गोळ्यांची मिळून एक गोळी केली आहे. ही गोळी रुग्णाच्या वजनानुसार द्यायची आहे. रुग्णाला 28 दिवसांच्या गोळ्या दिल्या जातात. रोजच्या रोज ठरलेल्या वेळेत न चुकता ही गोळी रुग्णाला देण्याची जबाबदारी नातेवाइकांवर सोपविली आहे. नऊ महिन्यांपासून ते दोन वर्षांपर्यंत या उपचाराचा कालावधी आहे. या दरम्यान, "डॉट प्रोव्हायडर्स' करून रुग्णाला औषधे दिली जातील.'' "डेली रेजिम'अंतर्गत पूर्ण कालावधीची औषधे घेतल्यानंतर रुग्णाच्या थुंकीचे नमुने तपासले जातात. त्यात जंतू न आढळल्यास रुग्ण रोगमुक्त झाल्याचे निश्चित केले जाते, असेही त्यांनी सांगितले.
|