प्रदूषण नियंत्रणासाठी ई-वाहने उपयुक्त

रामवाडी - अर्बन मोबिलिटी लॅबच्या उद्‌घाटनप्रसंगी (डावीकडून) ज्यूल्स कोर्टेनहॉस्ट, शीतल तेली-उगले, कुणाल कुमार, मुक्ता टिळक, आशिषकुमार सिंग, अनिल श्रीवास्तव, डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि राजेंद्र जगताप.
रामवाडी - अर्बन मोबिलिटी लॅबच्या उद्‌घाटनप्रसंगी (डावीकडून) ज्यूल्स कोर्टेनहॉस्ट, शीतल तेली-उगले, कुणाल कुमार, मुक्ता टिळक, आशिषकुमार सिंग, अनिल श्रीवास्तव, डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि राजेंद्र जगताप.

पुणे - ‘‘शहरी अन्‌ ग्रामीण भागाची सांगड घातली, तर ‘मोबिलिटी’ खऱ्या अर्थाने स्मार्ट होईल आणि त्यातून विकासाचे उद्दिष्ट साध्य होईल,’’ असे प्रतिपादन निती आयोगाचे सल्लागार (वाहतूक) अनिल श्रीवास्तव यांनी केले. प्रदूषण नियंत्रणासाठी ई-वाहने उपयुक्त असल्याचेही त्यांनी सांगितले. 

महापालिका आणि अमेरिकेतील रॉकी माउंटेशन इन्स्टिट्यूट (आरएमआय) यांच्यातर्फे सोमवारी आयोजित केलेल्या अर्बन मोबिलिटी लॅबच्या उद्‌घाटन प्रसंगी श्रीवास्तव बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्मार्ट सिटी मिशनचे सहसचिव कुणाल कुमार, वाहतूक खात्याचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंग, अतिरिक्त आयुक्त शीतल तेली-उगले, ‘आरएमआय’चे मुख्य कार्यकारी अधिकारी कोर्टेनहॉस्ट आदी उपस्थित होते. 
शहरी एकात्मिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी या दोन दिवसांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यात वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ आणि स्वयंसेवी संस्था, विविध शासकीय संस्था आणि उद्योगांच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. शहरी वाहतुकीमध्ये उद्‌भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आरएमआयने देशात पहिल्यांदाच पुणे शहराची निवड केली आहे. पुण्याच्या धर्तीवर अन्य शहरांतही नजीकच्या काळात अशा लॅबचे आयोजन करण्यात येणार आहे. 

श्रीवास्तव म्हणाले, ‘‘शहरी वाहतुकीचा विचार करताना ग्रामीण भागाकडेही लक्ष द्यायला हवे. त्यातून शहर आणि ग्रामीण अशी सांगड घालता येईल अन्‌ विकास होऊ शकतो. निती आयोग त्यादृष्टीने प्रयत्नशील आहे.’’ 
पुण्याची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी महापालिका करीत असलेल्या विविध उपाय योजनांची माहिती महापौरांनी दिली. राज्य सरकारकडून शहरी वाहतुकीला पूरक धोरणाला चालना देण्यात येत असल्याचे आशिषकुमार सिंग यांनी सांगितले. पुण्यासारख्या शहराच्या वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात आराखडे तयार झाले आहेत. आता त्याच्या अंमलबजावणीची गरज असल्याचे कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले. डॉ. धेंडे यांनी आभार मानले.

ई-वाहनांवर भर देण्याची गरज
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी देशात १ लाख लोकसंख्येमागे १०० बस हव्यात. त्यानुसार १२ लाख ५० हजार बस सध्या रस्त्यावर हव्यात. परंतु, त्यात आपण खूप मागे आहोत. एक हजार लोकसंख्येमागे प्रवासी वाहतूक करणारी किमान २० वाहने हवीत, तर देशात दरवर्षी सुमारे २ कोटी दुचाकी रस्त्यावर येतात. त्यातून २६ टक्के प्रदूषण होते. त्यामुळे यापुढील काळात ई-वाहनांवर भर द्यायला हवा, असे श्रीवास्तव यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com