निवडणुकीचा ‘बाजार’!

निवडणुकीचा ‘बाजार’!

पुणे - शहरात सध्या आठवडा बाजारांचे पेव फुटले आहे. विशेष म्हणजे राज्यांत सर्वांत अधिक शेतकरी आठवडे बाजार पुण्यात असल्याची माहिती पुढे आली आहे. महापालिका किंवा इतर प्रशासनाकडून कोणतेही नियोजन नसताना ही किमया झाली कशी, याचे उत्तर आगामी निवडणुकीत दडले आहे. मतदारांपर्यंत पोचण्यासाठी विद्यमान आणि इच्छुक उमेदवारांकडून आठवडा बाजार भरविण्याची स्पर्धा सुरू आहे.

शेतीमालाच्या थेट विक्रीसाठी राज्य सरकारकडून गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजना राबविली जात आहे. विविध गावांतील शेतकऱ्यांचे गट शहरांतील विविध भागांत शेतीमालाची विक्री करतात.

सुरवातीला या शेतकरी गटांना शेतीमालाच्या विक्रीसाठी जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करावे लागत होते. त्यांना आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद पण मिळत नव्हता. पणन मंडळाने ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘आठवडे बाजार’ आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार विशेषत: शहराच्या पूर्व भागांतील उपनगरात ते सुरू झाले. बाणेर, बावधन, वारजे माळवाडी, कोथरूड, सिंहगड रस्ता भागात, त्याचप्रमाणे दक्षिण पुण्यातही हे बाजार सुरू झाले. गेल्या वर्षी कात्रज येथे एका लोकप्रतिनिधीने तेथील आठवडे बाजाराला विरोध केल्याने तो बंद करून दुसऱ्या जागी हलवावा लागला होता. पण आता परिस्थिती बदलली आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या सहा महिन्यांत ‘आठवडे बाजार’ ही संकल्पनाच इच्छुक उमेदवारांनी उचलून धरली. 
 

शहरांत ३९ आठवडे बाजार सुरू असून, त्यापैकी ३२ बाजार सुरू करण्यासाठी इच्छुकांची मदत जागेची अडचण सोडविण्यासाठी काही इच्छुकांकडून खासगी जागा उपलब्ध, काहींनी गृहरचना संस्था, महापालिकेची मोकळी जागा शेतकरी गटांना दिली. 

या बाजाराला त्या भागातील दीड ते दोन किलोमीटर परिसरातील अडीच ते तीन हजार लोक भेट देतात. 

बाजाराच्या निमित्ताने इच्छुकांचा नागरिकांशी थेट संपर्क साधणे सोपे
 

आम्हीच सुरू केल्याचा दावा 
या आठवडे बाजाराची प्रसिद्धी, त्याविषयी जनजागृती करण्यासाठी इच्छुकांची यंत्रणा काम करीत आहे. जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच तिचे सपाटीकरण करणे, तेथे पाणी आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था करणे, निर्माण झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावणे, अशी कामे या इच्छुकांकडून सध्या होत आहेत. प्रचारासाठी ‘फ्लेक्‍स’ लावण्याचे कामही या इच्छुकांनी बाजार सुरू झाल्यानंतर केले. आमच्या प्रयत्नांतून हे सुरू झाल्याचा दावाही ते करीत आहेत. 

इच्छुक उमेदवार म्हणतात...
विविध तीर्थस्थळी यात्रा काढणे किंवा इतर खर्चिक कार्यक्रम राबविण्यापेक्षा हा उपक्रम मला अधिक लोकोपयोगी वाटतो. ग्राहक आणि शेतकरी यांचे नाते जोडताना मलाही त्याचा फायदा झाला आहे. अनेक नागरिकांचे संपर्क क्रमांक मला उपलब्ध झाले. त्यांच्या संपर्क क्रमांकावर बाजारातील भाजीपाल्याचे भाव, कोणत्या फळांची, भाजीची आवक अधिक आहे, याची माहिती पोचविली जात आहे. त्यामुळे त्यांच्यापर्यंत माझे नाव पोचण्यास मदत झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com