तृतीयपंथी लढवणार निवडणूक

आगामी निवडणुकीसाठी सज्ज झालेले तृतीयपंथी.
आगामी निवडणुकीसाठी सज्ज झालेले तृतीयपंथी.

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीत यंदा प्रथमच पाच तृतीयपंथी उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे. निवडणुकीसाठी त्यांनी चाचपणी सुरू केली असून, प्रस्थापित राजकीय पक्षाची उमेदवारी मिळो अथवा न मिळो, अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर त्यांचा भर राहणार आहे. यासंदर्भात शहरातील तृतीयपंथीय संघटित झाले असून, निवडणुकीसाठी भेटीगाठी, चर्चा व बैठका सुरू केल्या आहेत. 

पिंपरी - चिंचवड शहरात सुमारे साडेतीन हजार तृतीयपंथीयांची 
आहेत. दापोडी ते लोणावळा या परिसरात ते विखुरलेले आहेत.  ग्रॅज्युएट अन्‌ इंजिनिअर असे उच्चशिक्षित तृतीयपंथी आहेत. मात्र, समाजातील एक भाग असलेला तृतीयपंथी समाजाला पूर्णपणे सरकारने पोरके केले आहे. आम्हाला अन्यायाची वागणूक मिळत आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष तरतूद आहे. त्याचप्रमाणे तृतीयपंथी समाजासाठीही तरतूद असायला हवी. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहणारा हा समाज जीवन जगत आहे. एका दहा बाय दहाच्या खोलीत १५ ते २० तृतीयपंथी राहत असून, समाज आम्हाला तुच्छतेने पाहत असल्यामुळे कोणत्याही रोजगाराच्या संधी नसल्यामुळे त्यांना नाइलाजास्तव भीक मागून उदरनिर्वाह करावा लागत आहे. 

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार तृतीयपंथीयांना मतदानाचा अधिकारही दिलेला आहे. चेन्नईमध्ये एक तृतीयपंथी पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) आहेत, तर उत्तर प्रदेशमध्ये शबनम मावशी यांनी महापौर पदाची जबाबदारी पार पाडली. त्यामुळे आता महाराष्ट्रात समाज प्रबोधनाची गरज निर्माण झाली आहे. समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात तृतीयपंथी उतरल्याशिवाय पर्याय नाही. कारण, कोणत्याही राजकीय पक्षाने आमच्यासाठी काहीही केलेले नाही. त्यामुळे आमच्यावर निवडणूक लढविण्याची वेळ आली आहे. मतदार यादीत आमची नावे असून यापूर्वी आम्ही मतदानाचा हक्क बजावला आहे. आगामी महापालिकेच्या निवडणुकीत एक तरी तृतीयपंथी महापालिका सभागृहात निवडून जावा, यासाठी आम्ही विशेष प्रयत्न करणार असल्याचे पापाभाई यांनी सांगितले. समाजहिताबरोबरच तृतीयपंथीयांचा विकास करण्यासाठी ‘तृतीयपंथी’च निवडणूक लढवणार असून येत्या १४ ऑक्‍टोबरला पत्रकार परिषदेत पाच उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत. 

आधार कार्ड व पॅन कार्डावर स्त्री, पुरुष आणि ‘अन्य’ असा उल्लेख असतो. अन्य ऐवजी तृतीयपंथी असा स्पष्ट उल्लेख करावा. गेल्या तीन वर्षांपासून ‘घरकुल’साठी पाठपुरावा सुरू आहे, मात्र महापालिकेकडून या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. समस्या सोडविण्यासाठी नागरिकांना लोकप्रतिनिधींच्या दारात जावे लागते. मात्र, आम्ही दारोदारी जाऊन मतदारांच्या समस्या सोडविणार, असेही ते म्हणाले.

महिलांच्या संरक्षणासाठी समिती
आजच्या घडीला महिलांवरील होणाऱ्या अन्याय, अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. यासाठी शहरातील तृतीयपंथीयांनी ‘सुरक्षित महिला’ अशी समिती स्थापन केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com