पुणे - 'शेतकरी ते ग्राहक थेट विक्री योजनेसारख्या उपक्रमाला महापालिका सातत्याने सहकार्य करेल,'' अशी ग्वाही महापौर मुक्ता टिळक यांनी संत्रा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी दिली.
बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात संत्रा महोत्सव सुरू झाला असून, 30 मार्चपर्यंत तो सुरू राहणार आहे. या महोत्सवाचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन झाले. या वेळी पणन संचालक डॉ. किशोर तोष्णीवाल, सरव्यवस्थापक मिलिंद आकरे, अभिजित फाळके, पवन गुरव आदी उपस्थित होते.
'शेतकऱ्यांना त्यांनी पिकविलेल्या शेतीमालाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्याचवेळी ग्राहकालाही तो रास्त भावात मिळाला पाहिजे. या भूमिकेतून शेतकरी ते ग्राहक थेट विक्रीसारखे उपक्रम उपयुक्त आहेत. शेतकऱ्यांनीदेखील या उपक्रमात सहभागी होणे गरजेचे आहे. नागरिकांनीदेखील या प्रकाराच्या उपक्रमांकडे शेतकऱ्यांना मदतीचा हात या दृष्टिकोनातून पाहायला हवे,'' असे टिळक यांनी सांगितले.
एकीकडे ग्राहकाला योग्य भावांत शेतीमाल मिळत नाही, तर शेतकऱ्याला त्याचा मोबदलाही मिळत नाही, अशी स्थिती असल्याकडे डॉ. तोष्णीवाल यांनी लक्ष वेधले.
'घाऊक बाजारपेठेतील भाव आणि किरकोळ विक्रीचे भाव यात मोठी तफावत दिसून येते. ग्राहक देत असलेली रक्कम जास्तीत जास्त प्रमाणात शेतकऱ्याला मिळाली पाहिजे. शेतीमालाच्या विक्रीतील मध्यस्थांची संख्या कमी करून ग्राहकांना चांगल्या दर्जाचा माल योग्य भावांत मिळावा, यासाठी राज्य सरकारने "संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडे बाजार' सुरू केले आहेत,'' असे तोष्णीवाल यांनी सांगितले.
|