उंडवडी : बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील उंडवडी सुपे परिसरात अद्यापही दमदार पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पेरण्या रखडलेल्या आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरा ढगाकडे लागल्या आहेत.
जिरायती भागातील उंडवडी सुपे, उंडवडी कडेपठार, कारखेल, खराडेवाडी, सोनवडी सुपे, जळगाव सुपे, जराडवाडी देऊळगाव रसाळ आदी परिसरात अद्यापही दमदार पाऊस नसल्याने पाणी टंचाई आणि खरीप हंगामातील पेरण्या रखडलेल्या आहेत. तसेच ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई व चारा टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीपूरक दुग्धोव्यावसाय अडचणीत आला आहे.
याभागातील खरीप हंगामात बाजरी, मूग, उडीद, गुलछडी, चारा पिके आदी पिके घेत असतात. मात्र जून महिना संपत आला, तरी देखील दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. शेतकऱ्यांनी शेतात पेरणी पूर्व मशागत करुन ठेवली आहे. दररोज ढग येतात आणि सुसाट्याचा वारा वाहून ढग जातात असेच गेल्या पंधरा दिवसापासून सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे लागले आहे.
शिरसाईच्या पाण्यामुळे काही प्रमाणात दिलासा..
दरम्यानच्या काळात, शिरसाई उपसा सिंचन योजनेचे पाण्याचे आवर्तन या भागातील गावात सोडण्यात आले होते. त्यामुळे काही प्रमाणात पाणी टंचाई कमी झाली असली तरी बहुतांशी भागात आजही पाणी टंचाईच्या झळा कायम आहेत. या भागातील शेतकऱ्यांनी पाझर तलावात सोडून घेतले आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.