शेतकऱ्यांना चांगला हमीभाव द्यावा - राजू शेट्टी

शेतकऱ्यांना चांगला हमीभाव द्यावा - राजू शेट्टी

पुणे - डाळी आणि तेलबियांचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता आणि चांगला हमीभाव द्यावा, त्यासाठी पाचशे कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे केली. शेतीमालासंबंधी देशाचे आयात-निर्यात धोरण स्थिर असावे, अशी सूचना त्यांनी केली.

केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत (2017-18) देशातील शेतकरी संघटनांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी दिल्लीत जेटली यांनी अर्थसंकल्पपूर्व बैठक शनिवारी घेतली. त्या वेळी शेट्टी यांनी ही मागणी केली. शेतकरी, शेतीमाल याविषयीच्या सोळा मागण्या या वेळी केल्याचे शेट्टी यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत सांगितले.

शेट्टी म्हणाले, 'स्टेट बॅंकेने सात हजार कोटी रुपयांची थकीत कर्जे बुडीत खात्यात जमा केली. अन्य राष्ट्रीयीकृत बॅंकांही तशी पावले उचलत आहेत. मूठभर उद्योगपती ज्यांनी बॅंका अडचणीत आणल्या, त्यांच्यावर कारवाई नाही. त्यांची नावेही जाहीर करीत नाहीत. मग 50 हजार रुपये कर्ज घेतलेले शेतकरी आत्महत्या करतात, त्यांची कर्जेही माफ करावीत, अशी आमची मागणी आहे. श्रीमंतांसाठी एक आणि शेतकऱ्यांसाठी एक न्याय हे आम्ही चालू देणार नाही.''

शेतकऱ्यांच्या जमिनीच्या रेडीरेकनरच्या किमतीनुसार त्यांना कर्ज देण्याची सूचना आम्ही केली आहे. अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीमालाच्या होणाऱ्या नुकसानीचा विमा देताना, त्या मालाच्या प्रमाणाबरोबरच त्याची प्रतही विचारात घेतली पाहिजे. ग्रामीण युवकांसाठी शेतीमालावर प्रक्रिया उद्योग सुरू करावेत, अशी मागणी अर्थमंत्र्यांकडे केल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com