विदेशी फिल्म मेकर्सला सवलत का?

विदेशी फिल्म मेकर्सला सवलत का?

पुणे - ‘देशातील निसर्ग सौंदर्याचे आकर्षण जगातील फिल्म मेकर्सला आहे. परंतु, विदेशी फिल्म मेकर्स आणि छायाचित्रकारांसंदर्भात देशात असणारे नियम आणि कायदे हवे तसे वाकवत त्याचा फायदा घेतात. वन्यजीव चित्रीकरणात आपल्या तुलनेत विदेशी फिल्म मेकर्सचे स्थान अधिक आहे; अन्यथा गुणवत्तेच्या बाबतीत भारतीय फिल्म मेकर्स कणभरही मागे नाहीत,’’ असं मत भारतीय वन्यजीव छायाचित्रण आणि फिल्म मेकिंगमधील ‘देव’ समजल्या जाणाऱ्या वन्यजीव छायाचित्रकार राजेश बेदी यांनी व्यक्त केलं.

‘देशात सर्वांसाठी समान नियम आणि कायदे असले, तरीही पैसा आणि त्यांचा रंग गोरा याच्या बळावर विदेशी फिल्म मेकर्स आणि छायाचित्रकारांना हवे तसे ‘चित्रण’ करू दिले जाते, हे वास्तव असून असे का होतंय?’, असा सवाल बेदी यांनी केला आहे. बेदी हे एका कार्यक्रमानिमित्त 

पुण्यात आले आहेत. यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली...अन्‌ या उत्तरोत्तर रंगत गेलेल्या संवादातून वन्यजीवनातील भावविश्‍वाचे गमक उलगडले. 
‘‘देश आणि विदेशातील फिल्मबद्दल बोलताना ‘सर्वोत्कृष्टता’ या निकषावर तुलना केली जाते. आपल्या देशातही चांगल्या फिल्मस्‌ बनविल्या जात आहेत; पण चांगली फिल्म कशाला म्हणायचे हे समजून घ्याला हवं,’’ असं त्यांनी सूचविलं. ‘‘सर्वोत्तम माहितीपट किंवा ‘क्‍लिक’ हवा असल्यास समर्पणाची वृत्ती असायला हवी. मात्र, या वृत्तीने काम करणारे मोजकेच असल्याची खंत आहे. व्यक्तीच्या समर्पणापुढे पैसा आणि अद्ययावत तंत्रज्ञान गौण आहे,’’ असंही बेदी यांनी सांगितलं.

जंगल की ‘आत्मा’...
‘‘जंगलाचा आत्मा कॅमेऱ्याद्वारे दाखवायचा असतो, त्यामुळे आम्ही जीव ओतून कॅमेऱ्यात एक-एक क्षण टिपण्याचा प्रयत्न करतो. अनेकदा प्रत्यक्ष डोळ्यांनी समोरील दृश्‍य पाहिलेलच नसतं. त्याऐवजी कॅमेऱ्यातून ‘तो’ क्षण टिपलेला असतो. ‘निसर्गाचे सौंदर्य आपण जसे प्रत्यक्ष पाहतो, अनुभवतो, तोच अनुभव प्रेक्षकांना फिल्मद्वारे देण्यात फिल्म मेकर यशस्वी होतो का?’, या प्रश्‍नाचे उत्तर देताना बेदी म्हणाले, ‘‘कुदरत को जैसे है वैसेही दिखाने की कोशिश हर फिल्म मेकर की होती है; परंतु चांगला फिल्म मेकर कधीही १०० टक्के समाधानी असू शकत नाही. कारण १०० टक्के यशस्वी झाल्याचं म्हटलं, की आणखी प्रयत्नांना पूर्णविराम मिळतो. म्हणून मी म्हणेल, ‘‘और अच्छा करने की गुंजाईश रहती है.’

माळढोक, हत्ती, नीलगायकडेही हवं लक्ष
आपल्याकडील पर्यटन हेच मुळी ‘वाघ’ केंद्री आहे. जागतिक स्तरावरूनही वाघ वाचविण्याबाबत दबाव येत आहे. म्हणून सरकारही व्याघ्र प्रकल्पांकडे अधिक लक्ष देत आहे; परंतु वाघांबरोबरच गिधाड, माळढोक, नीलगाय यांच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. वन्यजीव संवर्धनासाठी लोकांमध्ये जागृती करण्याची गरज असून, त्याची सुरवात शालेय शिक्षणातून व्हावी. त्यासाठी अभ्यासक्रमात वन्यजीव संवर्धनाचा समावेश केला पाहिजे.

‘हिमबिबट्या’ अन्‌...
बेदी ब्रदर्स दोन वर्षांपासून ‘हिमबिबट्या’वर काम करत आहेत. याबद्दल ते म्हणाले, ‘‘हिमाचल प्रदेशात १५ हजार फूट उंचावरील बर्फाळ डोंगरावर आम्ही ‘कॅम्प’ केला तो ‘हिम बिबट्या’वर फिल्म बनविण्यासाठी. सुरवातीला आम्ही एकाच ठिकाणी २२ दिवस होतो. मात्र, बिबट्याचे दर्शन झाले नाही. तेविसाव्या दिवशी पहाटे मी तंबूत जाऊन बसलो आणि काही तासांनी एका छिद्रातून बाहेर डोकावले, तर मला चार-पाच फुटांवरच बिबट्याचे दर्शन झालं. तो क्षण म्हणजे अत्यानंदाचा अनुभव देणारा असला तरीही लगेच हालचाल करून कॅमेऱ्यात तो क्षण कैद करणं शक्‍य झालं नाही.’’ बेदी हे 
आणखी एक वर्ष हिमबिबट्यावर काम करणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com