देशहितासाठी चांगले विचार जोपासा - डॉ. के. व्यंकटेशम

कात्रज - सरहद संस्थेतर्फे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांचा सत्कार करताना काश्‍मिरी विद्यार्थिनी.
कात्रज - सरहद संस्थेतर्फे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांचा सत्कार करताना काश्‍मिरी विद्यार्थिनी.

कात्रज - जेव्हा जेव्हा देशाला विचारांची गरज भासली तेव्हा पुणे शहराने ते देण्याचे काम सातत्याने केले आहे. सर्वांना सामावून घेण्यासह या शहरातील मूल्यांचा अंगीकार केल्यास कोणताही संभ्रम आणि समस्या शिल्लक राहणार नाहीत, देश हितासाठी चांगल्या विचारांची जोपासना करा आणि परिवर्तनाचा भाग व्हा, असे आवाहन पुणे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी काश्‍मिरी विद्यार्थ्यांना केले.

शिक्षणासाठी पुणे शहरात आलेल्या जम्मू काश्‍मीरच्या विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सरहद संस्थेने पोलिस आयुक्तांशी थेट संवाद साधण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती. या निमित्ताने सरहदच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी आपला परिचय करून दिला. सध्याच्या वातावरणात पुणे शहरातही नोकरी आणि अनेक कारणांसाठी काश्‍मीर असा उल्लेख होताच संशयाने पाहिले जात आहे. हे संशयाचे आणि संभ्रमाचे वातावरण अडचणीचे ठरत असल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

सरहदने दिलेले शिक्षण आणि पुणेकरांच्या लाभलेल्या सहकार्यामुळे देशाचे जबाबदार नागरीक घडण्याचे भाग्य लाभले. आम्ही भारतीय आहोत हे आम्ही ठामपणे सांगतो त्याचवेळी तसा व्यापक स्विकार व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्‍त केली. 

वेंकटेशम म्हणाले, देशाच्या अत्यंत सुंदर अशा लेह लदाखमधील विद्यार्थ्यांना थेट वैचारीक शहरात आणून शिक्षण देण्याचे कठीण काम सरहद गेली पंधरा वर्षे निरंतर करत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे. लहान सहान घटनांकडे दुर्लक्ष करून विद्यार्थ्यांनी स्वच्छ अंत:करणाने उज्वल भविष्याकडे वाटचाल करणे आवश्‍यक आहे.

सरहदचे संस्थापक संजय नहार म्हणाले, सरहदसह पुणे शहरातील  अनेक शिक्षण संस्थांमध्ये काश्‍मिरी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांचे शहराशी जिव्हाळ्याचे नाते प्रस्थापित होण्यायोग्य वातावरण निर्माण करण्यासाठी पोलिसांचे सहकार्य आवश्‍यक आहे. काश्‍मिरी विद्यार्थ्यांसाठी सरहद मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि पत्रकारिता अभ्यासक्रम सुरू करत असल्याची माहिती नहार यांनी दिली. विश्वस्थ शैलेश वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सरहदच्या वतीने अकीब भट, जाहीद भट, जावेद वाणी, मोहंमद ईलियास, मुक्तार दार, जोगींदर सिंग, यावर खान, मंझूर बशीर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com