धायरी - 'ग्रामीण भागातून शहरी भागात जाताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. या पूर्वी झालेल्या बांधकामांना अभय दिले पाहिजे; पण त्याबरोबरच नवीन अनधिकृत बांधकामे सगळ्यांनी मिळूनच थांबविले पाहिजे. नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे,'' असे मत राज्याचे जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी व्यक्त केले.
धायरीतील मुक्ताई गार्डन येथे महापालिकेच्या वतीने "समाविष्ट गावांचे काय?' या विषयावर महाचर्चेचे आयोजन केले होते. त्या वेळी ते बोलत होते. आमदार भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, नगरसेवक राजाभाऊ लायगुडे, युवराज बेलदरे, सचिन दोडके, वसंत मोरे, जिल्हा परिषद सदस्या जयश्री पोकळे, रमेश कोंडे, राजाभाऊ रायकर, मिलिंद पोकळे, अश्विनी पोकळे, काका चव्हाण, विकास दांगट, हरिश्चंद्र दांगट, बाळासाहेब हगवणे, प्रवीण तुपे, संतोष पोकळे, रूपाली चाकणकर, युगंधरा चाकणकर, ऍड. गणेश सातपुते आदी उपस्थित होते.
या गावांच्या विकासासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद नव्याने करण्यात आली आहे. गावांचा रेंगाळलेला विकास टप्प्याटप्प्यात पूर्ण होईल, असे मोहोळ यांनी सांगितले. या गावांच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे अधिकार आमच्याकडे नाहीत. त्यासाठी लागणाऱ्या परवानग्यासाठीच्या अटी शिथिल कराव्यात, असे मत मोरे यांनी व्यक्त केले. राजाभाऊ रायकर, रमेश कोंडे यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन दीपक दराडे यांनी केले.
समाविष्ट झालेल्या 11 गावांसाठी 98 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. गावांच्या विकासासाठी मुख्यमंत्री लक्ष घालत आहेत. तसेच विकास आराखडाचे काम सुरू आहे. पाण्याची समस्यादेखील लवकरच सोडविली जाईल.
- भीमराव तापकीर, आमदार
या गावांच्या विकासासाठी किमान पाच हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. केवळ समावेश झालेल्या गावांपुरता मर्यादित विचार न करता पुढील टप्प्यात महापालिकेत समावेश होणाऱ्या गावांच्या विकासाचा विचारदेखील केला पाहिजे.
- योगेश टिळेकर, आमदार
फोटो : - dhaprt2-1dhayri, 2-2dhayri
धायरी - मुक्ताई गार्डन येथे "समाविष्ट गावांचे काय?' या विषयावर चर्चासत्रात सहभागी झालेले मान्यवर. |
|