पुणे - 'माओवाद्यांप्रमाणे देशातील दहशतवादी हल्लेही कमी झाले आहेत. लवकरच जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीतही सुधारणा होत असल्याचे चित्र दिसेल,'' असा विश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात आलेल्या जावडेकर यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. जावडेकर म्हणाले, 'काश्मीरमधील पत्रकार शुजात बुखारी यांची हत्या ही मोठी दुःखद घटना आहे. दहशतवाद्यांनी केलेली हत्या हा मोठा गुन्हा आहे. या घटनेची कितीही निर्भत्सना केली तरीही कमी आहे. देशातील वृत्तपत्रांचे आणि सामान्य नागरिकांचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे.''
'काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादाविरोधात कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यातून हताश होऊन अशा प्रकारचे भ्याड दहशतवादी हल्ले केले जात आहेत. याचे प्रमाणही निश्चित कमी होईल,'' असेही त्यांनी स्पष्ट केले.
|