कार्ला - 'आत्मशांती, परमात्माप्राप्ती हे आपले लक्ष्य असून, ते साध्य करण्यासाठी आपल्याला शरीर दिलेले आहे,' याकडे श्रीगुरू बालाजी तांबे यांनी आज साधकांचे लक्ष वेधले.
येथील आत्मसंतुलन ग्राममध्ये संतुलन वेद उत्सव आजपासून सुरू झाला. आठ दिवस चालणाऱ्या या शिबिरात सोमयोग व श्रीमहाभागवत कथन होणार आहे. या शिबिराला आरंभ करताना श्रीगुरू तांबे बोलत होते.
परमात्म्याला समजून घेण्यासाठी व्यासमुनींनी कृष्णलीला कथन केली. गर्भात असताना शुकदेवांनी ती ऐकली व नंतर महाभागवताची रचना केली, ही कहाणी सांगून श्रीगुरू तांबे म्हणाले, ""आकाशाहूनही अनंत असलेल्या आणि सूक्ष्माहून सूक्ष्म असलेल्या जगत् कर्त्याचे वर्णन करता येत नाही. त्याला उपमा तरी कशाची देणार? विश्वाला व्यापूनही दशांगुळे उरणाऱ्या परमात्म्याला समजून घेण्यासाठी हे शरीर दिलेले आहे. शरीर माद्यं खलु धर्मसाधनम्. जीवात्म्याला कोणतीही कृती करण्यासाठी आवश्यक असलेल्या शरीराची नीट काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आयुर्वेदात मार्गदर्शन करण्यात आले आहे.'' सोमध्यान करा, जनताजनार्दनाची सेवा करा, असे श्रीगुरू तांबे यांनी सांगितले. महेश्वरांच्या उपासनेने ज्ञानप्राप्ती होते. मात्र त्यासाठी क्रोधावर नियंत्रण ठेवा. वासनाक्षय झाला की आत्मशांती येते. म्हणून इंद्रियनिग्रह आवश्यक आहे. सर्वांना आनंद वाटा, म्हणजे आपोआप समृद्धी येईल, असेही त्यांनी सांगितले.
|